पुणे महापौर थेट जनतेतून निवडला, तर मनसेचाच विजय, वसंत मोरेंचं शिंदे-फडणवीसांना चॅलेंज
वसंत मोरे काय म्हणाले?
“सोयीनुसार प्रभाग रचना बदलली जात आहे. पण कितीही तोडा जोडा, आम्ही लढायला तयार आहोत. पुण्याचा पुढचा महापौर मनसेचाच असेल. हिंमत असेल तर निवडणुकांना सामोरे जा. महापौरांची निवडही जनतेतून करा” असं आवाहन वसंत मोरे यांनी केलं.
२०२२ च्या पुणे महापालिका निवडणुकांसाठी महाविकास आघाडी सरकारने तीन सदस्यीय प्रभाग प्रक्रिया पूर्ण केली होती. त्यानुसार मतदार याद्या झाल्या, मतदार केंद्र पाहणी झाली. मात्र आता शिंदे फडणवीस यांनी चार सदस्यांचा प्रभाग आणण्याचा घाट घातला आहे. यात नागरिकांचा कुठलाही विचार केला जात नाही. प्रत्येक जण आपल्या पक्षाची बाजू बघतोय, आमचे जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील, याचा विचार केला जातो, मात्र नागरिकांच्या कामांचा विचार केला जात नाही, अशी खंत वसंत मोरे यांनी व्यक्त केली.
हेही वाचा : …म्हणून पंतप्रधान मोदींनी शिंदे, केसरकर आणि सामंतांना काश्मीरमध्ये न्यायला हवे; शिवसेनेची बोचरी टीका
महाविकास आघाडीने फेब्रुवारीतच महापालिका निवडणुका घ्यायला हव्या होत्या. पण आरक्षण जाहीर केलंय तर आता का घाबरताय? हिंमत असेल तर निवडणूक लढवा, पुण्याचा महापौर जनतेतून निवडा, तो मनसेचाच असेल, असं मोरेंनी खात्रीने सांगितलं.
हेही वाचा : आदित्य ठाकरेंनी मुंबईत परतताच मर्मावर बोट ठेवलं; एकनाथ शिंदेंना चांगलंच कात्रीत पकडलं
महापालिका निवडणुका प्रभाग रचना जुन्या पद्धतीने
स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुका या २०१७ सालच्या प्रभाग रचनेप्रमाणेच घेण्याचा निर्णय नुकताच मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. महाविकास आघाडीने प्रभाग रचनेबाबत घेतलेले निर्णय रद्द ठरवण्यात आले. महाविकास आघाडी सरकारने वाढवलेली वॉर्ड संख्या नियमबाह्य पद्धतीने केली असल्याचा दावा करत शिंदे फडणवीस सरकारने केला.
हेही वाचा : सोलापूरहून १४ दिवस पायी प्रवास, बाळासाहेबांचा लाडका ‘प्रति दादा कोंडके’ उद्धव ठाकरेंच्या भेटीला