सोलापूरमध्ये चिंतेचं वातावरण; हिप्परगातून कोणत्याही क्षणी पाणी सोडले जाणार


हायलाइट्स:

  • सोलापूरमध्ये मुसळधार पाऊस सुरूच
  • हिप्परगा तलावातून कोणत्याही क्षणी पाणी सोडावे लागणार
  • सोलापूर शहरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

सूर्यकांत आसबे । सोलापूर

सुमारे १५० वर्षे पूर्ण झालेला सोलापूर-तुळजापूर रस्त्यावरील सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणारा व सोलापूर शहराची वरदायिनी असणारा एकरूख अर्थात हिप्परगा तलाव ९५ टक्के भरला असून १०० टक्के भरल्यानंतर सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे शहरातून गेलेल्या ओढ्याची पाणीपातळी वाढून आजूबाजूच्या वसाहतींमध्ये व घरांमध्ये पाणी जाऊन नागरिकांना धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर ओढ्याच्या आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवावे असे पत्र सोलापूर जलसंपदा विभागाने सोलापूर महानगरपालिकेला दिले आहे. तर अतिक्रमण झाल्यामुळे ओढ्याचे नाल्यात रूपांतरित झाल्यामुळे तसेच अतिक्रमण होत असताना सोलापूर महापालिकेने त्याकडे गांभीर्याने न पाहिल्यामुळे शहरातून जाणाऱ्या ओढ्याच्या लागून झालेल्या नागरिकांची झोप उडाली आहे.

वाचा: LIVE गुलाब चक्रीवादळाचा धोका! पाच जिल्ह्यांना रेड अॅलर्ट

सोलापूर-तुळजापूर रस्त्यावरील एकरुख अर्थात हिप्परगा तलाव आतापर्यंतच्या ३१ वर्षात ४ वेळा शंभर टक्के भरला आहे. मंगळवारी हिप्परगा तलावाची टक्केवारी ९५ होती तर वरून येणाऱ्या ओढ्यातील पाण्याचा वेग आणखी वाढतच असल्यामुळे येत्या दोन दिवसांत हिप्परगा तलाव १०० टक्के भरण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर तलावाच्या दोन सांडव्यामधून पाणी सोडण्यात आल्यानंतर हे पाणी सोलापूर शहरातील अवंती नगर, मडकी वस्ती, पांढरे वस्ती, बसवेश्वर नगर, वसंत विहार, देगाव, बेलाटी मार्गे सीना नदीत जाते. परंतु ओढ्याच्या अगदी खेटूनच नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणं करून कच्ची व पक्की घरे बांधल्यामुळे पाण्याची वाट अडविली गेली आहे. त्यामुळे नैसर्गिक ओढा रुंदीकरण करूनसुद्धा पूर पातळीपर्यंत अतिक्रमण कायम असल्याने शहरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

वाचा: उद्धव ठाकरेंमुळं काँग्रेसवाले जिवंत झाले; आमदाराचा थेट हल्लाबोल

दरम्यान हिप्परगा तलावातील पाण्याची पातळी वाढत असल्याचे लक्षात येताच सकाळी मनपा आयुक्त पी. शिवशंकर, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता संजय धनशेट्टी, नगरअभियंता संदीप कारंजे, तलावाचे शाखा अभियंता शिरीष जाधव यांनी तलावावर जाऊन पाहणी केली. तलाव भरल्यानंतर पाणी सोडण्यात आल्यामुळे नेमका कोणत्या भागातील नागरिकांना धोका पोहोचू शकतो याची माहिती शिरीष जाधव यांनी मनपा आयुक्तांना दिली. ओढ्यावरील अतिक्रमणाला महापालिकाच जबाबदार असल्याचा आरोप तलाव संघर्ष समितीचे प्रमुख व तळे हिप्परगा येथील रहिवाशी रतिकांत पाटील यांनी केला आहे.

अतिवृष्टीमुळे यंदा १८ दिवस अगोदर भरतोय तलाव

१८७१ झाली बांधलेला हा एखरुख तलाव आहे. आदिला नावाच्या ओढ्यावर ब्रिटिश काळात तलावाची बांधणी झालेली आहे. या प्रकल्पाला १५० वर्षे पूर्ण झाले असून गेल्या ३१ वर्षांमध्ये हा प्रकल्प ४ वेळा १०० टक्के भरलेला आहे. त्यामुळेच यंदा १८ दिवस अगोदर तलाव भरतो आहे. १९९० , १९९८ ,२०२० आणि २०२१ अशी चार वर्ष गेल्या ३१ वर्षात १०० टक्के हा प्रकल्प भरतो आहे. हा प्रकल्प मुक्तद्वार सांडवा पद्धतीचा असल्यामुळे पूर्ण संचय पातळीला पाणी साठल्यानंतर १३४ मीटर लांबीचा उजवा सांडवा आणि ९१ मीटर लांबीचा डावा सांडवा या दोन सांडव्यामधून पाणी आदिला ओढ्यामध्ये जाते. ते प्रवाहित होऊन मडके वस्ती,अवंती नगरी, वसंत विहार, पांढरे वस्ती, बसवेश्वर नगर, देगाव, कवठे, डोणगाव बेलाटी यामार्गे सीना नदीत जाते. आता गेल्या वर्षी १४ ऑक्टोबरला अतिवृष्टीमुळे तलाव भरला होता. यावर्षी पर्जन्यवृष्टी चांगली असल्यामुळे १८ दिवस अलीकडेच तलाव भरला आहे. या संदर्भात सतर्क राहण्याच्या नोटिसा , दवंडी व पत्रव्यवहार अशा माध्यमातून संबंधित सर्व यंत्रणांना आणि बुडीत क्षेत्रात अतिक्रमण केलं होतं त्या लोकांना सांगून त्यांना बुडीत क्षेत्राच्या बाहेर काढले आहे. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यामुळे संकटाशी सामना करण्याची तयारी ठेवण्यात आली असल्याचे तलावाचे शाखा अभियंता शिरीष जाधव यांनी सांगितले.

वाचा: ‘धनंजय मुंडेंना पुढच्या १० निवडणुका कोणी हरवू शकत नाही’



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: