Amarinder Singh: गृहमंत्री अमित शहांच्या भेटीवर कॅप्टन अमरिंदर सिंह यांचं स्पष्टीकरण
हायलाइट्स:
- भाजपमध्ये प्रवेश नाही पण काँग्रेसमध्येही राहणार नाही, अमरिंदर सिंहांची घोषणा
- पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंहांचा काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा विचार
- अपमान सहन होत नाही : कॅप्टन अमरिंदर सिंह
- काय निर्णय घेणार अमरिंदर सिंह?
‘पक्षात वाईट वागणूक’
नुकतंच एका न्यूज चॅनलशी बोलताना कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी भाजपमध्ये दाखल होणार असल्याच्या चर्चा फेटाळून लावल्यात. ‘मी सध्या काँग्रेसमध्ये आहे, परंतु अधिक वेळ काँग्रेसमध्ये राहणार नाही. असा पद्धतीचं वर्तन मी सहन करू शकणार नाही’ असं त्यांनी म्हटलंय.
मी माझी स्थिती स्पष्ट केलेली आहे. मी अशा पद्धतीची वागणूक सहन करणार नाही. गेल्या ५२ वर्षांपासून मी राजकारणात आहे. माझे स्वत:चे काही सिद्धांत आणि मतं आहेत हे प्रत्येकाला ठाऊक आहे, असं म्हणतानाच आपल्याला दिल्या गेलेल्या वागणुकीवर त्यांनी नाराजी व्यक्त केलीय.
राजीनामा सोपवण्यादरम्यान घडलेल्या घडामोडींचा उल्लेख करताना, ‘रात्री १०.३० मिनिटांनी सीपी फोन करतात की तुम्ही राजीनामा द्या. यावर का? असा प्रश्न मी एकदाही त्यांना विचारला नाही. दुसऱ्या दिवशी ४.०० वाजता मी राज्यपालांकडे माझा राजीनामा सोपवला’ असंही सिंह यांनी म्हटलंय.
‘दिल्लीहून पाठवण्यात आलेले तीन पर्यवेक्षकांनी फोन केले की प्रदेश काँग्रेस समितीची बैठक आहे. मुख्यमंत्र्यांच्या घरी कुणीही जाऊ नये. ५० वर्षानंतरही माझ्यावर कुणी अविश्वास दाखवत असतील, माझ्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करत असतील तर मग बाकी काहीच उरत नाही. माझा विश्वासच नसेल तर माझ्या पक्षात राहण्यालाही काही अर्थ नाही’ असं म्हणत त्यांनी आपला संतापही व्यक्त केला.
गृहमंत्र्यांच्या भेटीमागचं कारण सांगितलं
गृहमंत्री अमित शहा आणि एनएसए अजित डोवाल यांच्याशी झालेल्या भेटींमागचं कारणही यावेळी अमरिंदर यांनी सांगितलंय. ‘अमित शहा यांच्याशी शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर तर अजित डोवाल यांच्याशी राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावर’ चर्चा केल्याचं त्यांनी सांगितलंय.