Farmers Protest: शेतकरी आंदोलक -पोलिसांची पुन्हा धुमश्चक्री; आंदोलकांवर पाण्याचा मारा
हायलाइट्स:
- उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांच्या कार्यक्रमाला शेतकऱ्यांचा विरोध
- पोलिसांकडून आंदोलकांना रोखण्याचा अयशस्वी प्रयत्न
- हरयाणातल्या खट्टर सरकारविरोधात शेतकऱ्यांत तीव्र असंतोष
आज सकाळीच मोठ्या संख्येत महिला आणि पुरुष आंदोलक हातात झेंडे घेऊन उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रम स्थळाकडे जाताना दिसून आले. परंतु, पोलिसांकडून या आंदोलकांना रोखण्यात आलं.
या घटनेचा एक व्हिडिओ वृत्तसंस्था एएनआयकडून सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी पाण्याच्या टँकरच्या मदतीनं आंदोलकांवर पाण्याचा मारा केला. यानंतर आंदोलक मागे हटले नाहीत. त्यांनी आपला प्रवास सुरू ठेवला.
पोलिसांकडून आंदोलकांना रोखण्यासाठी बॅरिकेडसही उभारण्यात आली होती. परंतु, आंदोलकांनी ही बॅरीकेडसही उचलून रस्त्याच्या बाजुला फेकून दिली.
हरयाणात आंदोलक शेतकऱ्यांना रोखण्याचे सगळे प्रयत्न अपुरे पडताना दिसून येत आहेत. याआधी, पीक खरेदी प्रक्रिया सुरू करण्याची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय तसंच कृषी कायद्यांना विरोध करत शेतकऱ्यांकडून राज्यातील भाजप सरकारला इशारा देण्यात आला होता. उद्यापासून (२ ऑक्टोबर) खरेदी सुरू केली जावी अन्यथा परवा तुमचे आमदार, खासदार, नेत्यांना घराबाहेर पडता येणार नाही, असं म्हणत शेतकरी नेते गुरनाम सिंह चढूनी यांनी थेट हरयाणातल्या मनोहर लाल खट्टर सरकारला खुलं आव्हान दिलंय.