‘संजय राऊत हे कागदावरचे लीडर, त्यांना काय उत्तर द्यायचं’
हायलाइट्स:
- संजय राऊत यांना फडणवीसांचे जोरदार उत्तर
- ऑफिसात बसून शेतकऱ्यांचं दु:ख काय कळणार? – फडणवीस
- संजय राऊत हे कागदावरचे लीडर – फडणवीस
मराठवाडा व विदर्भात झालेल्या अतिवृष्टीमुळं तिथल्या शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. विधानसभेतील विरोधी पक्ष नेते फडणवीस व विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर सध्या या भागांचा दौरा करत आहेत. राज्य सरकारनं शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी दोन्ही नेत्यांनी केली आहे. शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून या नेत्यांवर टीका केली आहे. ‘पूर, दुष्काळ, अपघातप्रसंगी विरोधी पक्षाचे नेते दौरे करत असतात, तेव्हा त्यात राजकीय भागच जास्त असतो. संकटग्रस्त लोक अशा प्रसंगी अश्रूंना बांध मोकळा करून देतात व विरोधक त्याच अश्रूंचे भांडवल करून सरकारला धारेवर धरण्याची संधी घेतात. मराठवाड्यातील पूरस्थितीविषयी भूमिका मांडणाऱ्या फडणवीसांनी लगेचच देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्तानं पक्षीय राजकारण साधलं आहे. म्हणजे पूरग्रस्तांचं सांत्वन हा एक ‘मुखवटा’ होता आणि त्याआड दडलेले राजकारण हा ‘चेहरा’ होता, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.
वाचा: LIVE शाहरुख खाननं फोनद्वारे आर्यनशी साधला संपर्क; दोन मिनिटे बोलला
‘सामना’तील या टीकेवर फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘जे लोक ऑफिसमध्ये बसून टीका करतात. राजकारण करतात. त्यांना मैदानातली शेतकऱ्यांची परिस्थिती समजूच शकत नाही. ते कधी शेतकऱ्यांना भेटले नाहीत, त्यांचे अश्रू पाहिले नाहीत. हे कागदावरचे लीडर आहेत. ऑफिसातले लीडर आहेत. एखादा अग्रलेख लिहून नेते झाले आहेत. त्यांना काय उत्तर द्यायचं,’ असा टोला फडणवीसांनी हाणला आहे.
‘मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भागात यायचं की नाही हा त्यांचा निर्णय आहे. पण त्यांनी शेतकऱ्यांना मदत करायला हवी. या सरकारमध्ये संवेदनाच उरलेली नाही असं दिसतंय. पालकमंत्री सुद्धा जिल्ह्यात जात नसतील तर सरकारमध्ये कुठली संवेदना आहे हा प्रश्न आहे,’ असं फडणवीस म्हणाले. ‘विदर्भ आणि मराठवाडा हे महाविकास आघाडी सरकारच्या अजेंड्यावरच नाही. हे विदर्भ व मराठवाडा विरोधी सरकार आहे,’ असा आरोपही फडणवीसांनी केला.
वाचा: देवेंद्र फडणवीसांविषयी आम्हाला तसं काहीच म्हणायचं नाही: शिवसेना