नांदेडमध्ये भाजपनं खेळलेल्या खेळीमुळं शिवसेनेत अस्वस्थता
हायलाइट्स:
- देगलूर बिलोली पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापले
- माजी आमदार भाजपमध्ये गेल्यानं शिवसेनेत अस्वस्थता
- संजय राऊत यांनी भाजपसह सुभाष साबणेंवरही डागली तोफ
‘गेली अनेक वर्षे भाजप काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची माणसं आपल्या पक्षात घेत नाही. भाजपकडं स्वत:चं असं काही नाही. आता एक निवडणूक लढण्यासाठी त्यांनी शिवसेनेचा एक माणूस घेतलाय. तोही रडका. शिवसैनिक हा रडत नाही. परिस्थितीविरुद्ध लढतो. रडणाऱ्यांना, पळपुट्यांना शिवसेनेत स्थान नाही,’ असं राऊत म्हणाले. ‘दुसऱ्या पक्षातील लोक घेऊन सूज दाखवायचं जे धोरण भाजपनं सुरू केलंय, ते फार काळ चालणार नाही,’ असा इशाराही राऊत यांनी दिला.
वाचा: ‘प्रियंका गांधींना भाजप आणि यूपीचे मुख्यमंत्री का घाबरतात?’
रावसाहेब अंतापुरकर यांच्या आकस्मिक निधनानंतर देगलूर बिलोली मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. येत्या ३० ऑक्टोबर रोजी या जागेसाठी मतदान होणार आहे. ही जागा राखण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे, तर मंगळवेढ्यानंतर महाविकास आघाडीला पुन्हा एकदा धक्का देण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे. महाविकास आघाडीत हा मतदारसंघ काँग्रेसकडं आहे. महाविकास आघाडी नसताना युतीचे उमेदवार म्हणून साबणे यांनी शिवसेनेकडून इथं निवडणूक लढवली होती. मात्र, अंतापूरकर यांच्या निधनानंतर साबणे यांनी या जागेवर दावा केला होता. मात्र, शिवसेनेनं या जागेसाठी आग्रह धरला नाही. आपल्याला संधी मिळण्याची शक्यता कमी असल्याचं दिसताच साबणे हे भाजपच्या गोटात दाखल झाले आहेत. भाजपनं त्यांची उमेदवारी देखील जाहीर केली आहे. त्यामुळं शिवसेनेमध्ये अस्वस्थता आहे.
वाचा: शेतकऱ्यांना चिरडणं हे मोदींचं धोरण आहे का?; असले प्रकार ब्रिटिश राजवटीत व्हायचे’