शेतकरी हत्याकांडाचे महाराष्ट्रातही पडसाद; राज्य मंत्रिमंडळाने व्यक्त केला खेद
हायलाइट्स:
- शेतकऱ्यांच्या हत्याकांडानंतर देशभर संताप
- महाराष्ट्रातही उमटले पडसाद
- राज्य मंत्रिमंडळाकडून खेद व्यक्त करण्याचा ठराव
राज्य मंत्रिमंडळाने दोन मिनिटे उभे राहून मरण पावलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली देखील वाहिली. यासंदर्भात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रारंभी निवेदन केले आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी अनुमोदन दिलं.
पंतप्रधान मोदींच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह
‘शेतकऱ्यांच्या हत्येसारख्या अत्यंत गंभीर विषयावर कोणतीही प्रतिक्रिया पंतप्रधानांनी व्यक्त केलेली नाही. केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या मृत्यूचे कोणतेही सोयर सुतक राहिलेलं नसल्याचं हे द्योतक आहे. पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांसाठी कधी ट्वीट करणार? असा प्रश्न जनतेला पडला आहे,’ अशा शब्दांत राष्ट्रवादीने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
उत्तर प्रदेश राज्यातील लखीमपूर खीरी येथे शेतकऱ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदची हाकही देण्यात आली आहे.
दरम्यान, याआधीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लखीमपूर घटनेबाबत पत्रकार परिषद घेत केंद्र सरकार निशाणा साधला होता. या घटनेनं जालियनवाला बाग हत्याकांडाची आठवण झाल्याचं शरद पवार यांनी म्हटलं होतं.