‘भाजपला ‘ते’ सहन झालं नसावं म्हणूनच अजित पवारांच्या कंपन्यांवर छापे’
हायलाइट्स:
- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कंपन्यांवर आयटीचे छापे
- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया
- केंद्रातील मोदी सरकारवर केला गंभीर आरोप
घटस्थापनेच्या मुहूर्तावर आजपासून राज्यातील धार्मिक स्थळे खुली करण्यात आली. त्या निमित्तानं जयंत पाटील यांनी सकाळी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात व नंतर पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आजच्या छापेमारीवर प्रतिक्रिया दिली.
वाचा: शरद पवारांच्या गावातही पोहोचले ईडीचे पथक; काटेवाडीत एकाची चौकशी
‘आमच्या नेत्यांना बदनाम करण्याचं कारस्थान भाजपनं सुरू केलं आहे. भाजपनं राष्ट्रवादीचा धसका का घेतला आहे हे विचार करण्यासारखं आहे. धाड टाकली जाणार किंवा कारवाई केली जाणार हे भाजपच्या नेत्यांना आधी कळतं. त्यामुळं या देशातल्या सर्व तपास यंत्रणा भाजप चालवत आहे, हे आता जनतेलाही कळून चुकलं आहे. लखीमपूर इथं शेतकऱ्यांना चिरडण्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. जालियनवाला बागेपेक्षा क्रूर हत्याकांड तिथं घडलं. या घटनेचा निषेध म्हणून महाविकास आघाडी ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंद पाळत आहे. भाजपला हे सहन झालं नसावं म्हणूनच ही कारवाई करण्यात आली असेल,’ असा थेट आरोप जयंत पाटील यांनी केला.
वाचा: ‘माझ्यावरील कारवाई समजू शकतो, पण बहिणींच्या कंपन्यांवर छापे कशासाठी?’
‘आमचा कायद्यावर विश्वास आहे. छगन भुजबळ यांनाही असाच त्रास देण्याचा प्रयत्न झाला, मात्र ते निर्दोष सुटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते निर्दोष आहेत. कोणताही गैरव्यवहार त्यांच्याकडून झालेला नाही, तरीही त्यांना बदनाम करणं हाच यामागचा हेतू आहे. अजित पवारांनी कुठल्याही प्रकारची कागदपत्रं कधीच दडवलेली नाहीत. मग जाहीर करण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांच्याकडं दडवण्यासारखं काहीच नाही. ते कधीही काहीही दडवत नाहीत,’ असा दावा जयंत पाटील यांनी केला.