प्लॉप ठरलेल्या हार्दिक पंड्याबाबत रोहित शर्माने केला मोठा खुलासा, म्हणाला…


IPL 2021 : अबू धाबी : अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आयपीएलमध्ये गोलंदाजी करेल, असा विश्वास भारतीय क्रिकेट संघ निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांना होता, पण तसे झाले नाही. पण पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या टी-२० विश्वचषकापूर्वीपासून तो गोलंदाजीला सुरुवात करेल, अशी आशा भारताचा उपकर्णधार रोहित शर्माने व्यक्त केली आहे. पंड्या आयपीएलच्या यूएईमध्ये झालेल्या दुसऱ्या टप्प्यात पाच सामने खेळला, पण त्याला फारसे यश मिळाले नाही. निवड समितीच्या अध्यक्षांच्या जाहीर घोषणेनंतर असे वाटत होते की, तो गोलंदाजी करेल, पण पाच सामन्यात त्याने एकही षटक टाकले नाही.

रोहितने आयपीएलमधील मुंबईच्या शेवटच्या सामन्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “हार्दिकच्या गोलंदाजीबाबत बोलायचं झालं, तर त्याच्या गोलंदाजीवर फिजिओ आणि प्रशिक्षक काम करत आहेत. त्याने आतापर्यंत झालेल्या आयपीएलच्या सामन्यात एकही चेंडू टाकला नाही. आम्हाला एकावेळी एकच सामना लक्षात घेत त्याच्या फिटनेसचे आकलन करायचे होते. त्याच्या कामगिरीत दिवसेंदिवस सुधारणा होत आहे. कदाचित पुढच्या आठवड्यापर्यंत तो गोलंदाजी सुरू करू शकेल. केवळ डॉक्टर आणि फिजिओच याबद्दल अधिक माहिती सांगू शकतात.’

रोहित पुढे म्हणाला, ‘जोपर्यंत त्याच्या फलंदाजीचा प्रश्न आहे, तो थोडा निराश असेल, पण तो एक चांगला खेळाडू आहे. तो भूतकाळातील कठीण परिस्थितीतूनही बाहेर आला आहे. संघाला त्याच्या क्षमतेवर विश्वास आहे. मलाही त्याच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे.

‘आयपीएलमध्ये काय घडले आणि टी-२० विश्वचषकात काय होणार आहे, यावर मी जास्त लक्ष केंद्रित करू इच्छित नाही. टी-२० विश्वचषक ही एक वेगळ्या प्रकारची स्पर्धा आहे आणि फ्रँचायझी क्रिकेट त्यापेक्षा वेगळं आहे. फॉर्मचा फरक पडतो, पण दोन्ही ठिकाणी संघ भिन्न आहेत. त्यामुळे मी या गोष्टींकडे जास्त लक्ष देऊ इच्छित नाही,’ असंही त्यानं यावेळी स्पष्ट केलं.

रोहित व्यतिरिक्त, मुंबई इंडियन्स संघातील खेळाडू हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, राहुल चहर आणि जसप्रीत बुमराह यांचा टी-२० विश्वचषकासाठीच्या भारतीय संघात समावेश आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: