खा.शरद पवार व ना.नितीन गडकरी यांच्या प्रयत्नाने केंद्र शासनाने इथेनॉल निर्मितीचा निर्णय साखर उद्योगास दिलासा देणारा – आमदार संजयमामा शिंदे
करकंब येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगामाचा शुभारंभ उत्साहात संपन्न

करकंब/मनोज पवार – करकंब येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचा (युनिट-नं-2) सन २०२१-२२ या 3 -या गळीत हंगामाचा शुभारंभ आ.संजयमामा शिंदे यांच्या हस्ते व कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आ.बबनराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे सुरुवातीस प्रेरणास्थान कै.विठ्ठलराव शिंदे यांच्या प्रतिमेचे पुजन व दीपप्रज्वलन व्हाईस चेअरमन वामनराव उबाळे यांच्यासह मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत युनिट नं. 2 चे जनरल मॅनेजर एस.आर. यादव यांनी केले.
यावेळी बोलताना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे म्हणाले की,चालू गळीत हंगाम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनंत अडचणीतून सुरू होत असून सद्यस्थितीत जनजीवन व उद्योग व्यवसाय पुर्वपदावर येत आहेत.साखर उद्योगाला प्रतिवर्षी नवनवीन अडचणींना तोंड देत मार्गक्रमण करावे लागत आहे. कधी साखरेचे उत्पादन जास्त झाल्याने साखरेचे दर कमी होतात तर कधी उत्पादन कमी झाल्याने साखरेचे दर वधारतात.साखरेच्या दरामध्ये चढ-उतार होत असल्याने साखर उद्योगावर त्याचा प्रतिकूल परिणाम होत आहे. केंद्रशासनाने ठरवून दिलेल्या एम.एस.पी. पेक्षा कमी दराने साखरेची मागणी होत होती. सध्या ब्राझीलमध्ये दुष्काळ असल्याने साखरेच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे यावर्षी सर्व दृष्टीने चांगले दिवस आले आहेत. खा.शरद पवार व ना.नितीन गडकरी यांच्या प्रयत्नाने केंद्र शासनाने इथेनॉल निर्मितीचा निर्णय साखर उद्योगास दिलासा देणारा ठरणार आहे. विठ्ठलराव शिंदे कारखान्याने 2020-21 गळीत हंगामामध्ये गाळप केलेल्या ऊसास एफ.आर.पी.प्रमाणे ऊस पुरवठादारांना अदा केलेले आहे.कारखान्याने ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार यांची सर्व बिले, कमिशन डिपॉझीट वेळेत अदा केलेले असून 2021-22 मध्ये करार करण्यात आलेल्या यंत्रणेस सर्व हप्ते वेळेत दिलेले आहेत. डिझेल दरवाढीचा विचार करता वाढीव डिझेल दराचा फरक वाहन मालकांना देणेसाठी व्यवस्थापन सकारात्मक आहे. आ.बबनदादांच्या मार्गदर्शनाखाली युनिट नं.1 व 2 या कारखान्याची चौफेर प्रगती होत असून सभासद, ऊस पुरवठादार यांचे हित जोपासले जात आहे.सर्वांच्या सहकार्याने हंगाम यशस्वीपणे पार पडणार असून यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे असे प्रतिपादन आमदार संजयमामा शिंदे यांनी याप्रसंगी केले.
खा.शरद पवार यांच्या प्रयत्नाने तसेच साखर आयुक्त,कामगार प्रतिनिधी व साखर कारखान्याचे प्रतिनिधी यांच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे कामगारांना १२ टक्के प्रमाणे पगारवाढ करण्याचा निर्णय कारखाना व्यवस्थापनाने घेतला असून चालू महिन्यापासून त्याची अंमलबजावणी करण्यात येईल तसेच कामगारांना 15 दिवसाचे बक्षिस अदा करण्यात आले असून दिवाळीसाठी 8.33 टक्के प्रमाणे बोनस अदा करण्यात येणार आहे. युनिट नं.2 येथे 5 लाख मे.टन गाळप करणेचे उद्दिष्ठ ठेवलेले असून 12.5 मे.वॅट सहविजनिर्मिती प्रकल्पातून 3.50 कोटी युनिट निर्यात होणे अपेक्षीत आहे.
यावेळी आ.संजयमामा शिंदे,आ.बबनराव शिंदे व संचालक मंडळ,शेतकरी,अधिकारी आणि मान्यवर यांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून पूजन करून गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. कारखान्याचे संचालक लाला मोरे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.सुगंधाताई मोरे यांच्या हस्ते सत्यनारायण पूजा पार पडली.
कार्यक्रमास व्हाईस चेअरमन वामनराव उबाळे, जि.प.सदस्य रणजितसिंह शिंदे,सभापती विक्रमसिंह शिंदे, संचालक लाला मोरे, पोपट चव्हाण, रमेश येवले पाटील, शिवाजी डोके, प्रभाकर कुटे,वेताळा जाधव,पांडुरंग घाडगे, सचिन देशमुख, लक्ष्मण खूपसे, संदीप पाटील,सुरेश बागल ,कार्यकारी संचालक एस.एन.डिग्रजे,युनिट 2 चे चिफ इंजिनिअर एस.एस. महामुनी, चिफ केमिस्ट बी.जे.साळुंखे,शेतकी अधिकारी बी.डी. इंगवले,वर्क्स मॅनेजर सी.एस.भोगाडे, जनरल मॅनेजर (एच.आर.)पी.ए.थोरात ,जनरल मॅनेजर (प्रोसेस) पी.एस.येलपले, केन मॅनेजर एस.पी.थिटे, फायनान्स मॅनेजर डी.व्ही.लवटे, डिस्टीलरी मॅनेजर पी.व्ही. बागल,परचेस आँफिसर जे.डी.देवडकर, कामगार प्रतिनिधी अनिल वीर आदी उपस्थित होते.