Madhya Pradesh: ‘गरब्या’च्या निमित्तानं ‘लव्ह जिहाद’, बजरंग दलाच्या तक्रारीनंतर चार मुस्लीम विद्यार्थ्यांना अटक
हायलाइट्स:
- मध्य प्रदेशातील इंदूरमधील घटना
- ऑक्सफर्ड महाविद्यालयात गरब्याचं आयोजन
- महाविद्यालय प्रशासनानं कार्यक्रमाच्या व्यवस्थापनेची जबाबदारी सोपवल्याचं आरोपी तरुणांचं म्हणणं
- ‘देशाचं संविधान मुस्लीम मुलांना महाविद्यालयाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची परवानगी देत नाही?’
या चार तरुणांना ‘बजरंग दला’च्या कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलंय. इंदूरच्या ऑक्सफर्ड महाविद्यालयात या गरबा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
कार्यक्रमासाठी महाविद्यालय प्रशासनाकडून महाविद्यालयात शिकणाऱ्या दोन मुस्लीम तरुणांना व्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आली होती. ‘आपण गरबा खेळण्यासाठी दाखल झालो नव्हतो तर आयोजकांकडून इथं उपस्थित राहण्याची आणि व्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती’, असं एका आरोपी विद्यार्थ्यानं मीडियाशी बोलताना म्हटलं.
कार्यक्रमाची जबाबदारी सांभाळणाऱ्या मुस्लीम तरुणांवर ‘बजरंग दला’नं ‘लव्ह जिहाद’चा आरोप केल्यानंतर पोलिसांनीही या तरुणांवर कारवाई करत अटक केली.
आरोपी विद्यार्थ्यांनी नाकारले आरोप
२१ वर्षीय अदनान शाह या तरुणाला जामीन मिळाल्यानंतर त्यानं आपली बाजू मांडली. आपण इंदूरच्या ऑक्सफर्ड महाविद्यालयात बी कॉमच्या द्वितीय वर्षाला शिकत असल्याचं त्यानं सांगितलं. महाविद्यालय प्रशासनाकडून आपल्याला जबाबदारी सोपवण्यात आली होती. सायकल स्टँडवर गाड्या पार्क करण्यास सांगितल्यानंतर बजरंग दलाच्या सदस्यांनी इथे गोंधळ घालण्यास सुरूवात केली, असं अदनाननं म्हटलंय.
विद्यार्थ्यांपैंकी एकूण २५ स्वयंसेवक निवडण्यात आले होते. त्यापैंकीच मी एक होतो. मला सायकल स्टँडजवळचं काम सोपवण्यात आलं होतं. कार्यक्रमात अचानक १०० – १५० जण महाविद्यालयात शिरले आणि गोंधळ घालण्यास सुरूवात केली. त्यांनी मला माझं नाव विचारलं. नाव सांगितल्यावर त्यातल्या एकानं मला बाजुला होण्यास सांगितलं. मी माझं आयडी कार्ड दाखवल्यानंतर त्यांनी मलाच उलट ‘तू इथं का आहेस?’ असा प्रश्न विचारला, असं म्हणत अदनाननं आपली बाजू मांडलीय.
पालकांचा प्रश्न
या घटनेवर संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांकडून रोष व्यक्त करण्यात येतोय. आमच्या मुलांना गरबा कार्यक्रमात व्यवस्था सांभाळण्यासाठी महाविद्यालयानं बोलावलं होतं. परंतु, त्यांच्यावर नाहक ‘लव्ह जिहाद’चा आरोप करत त्यांना पोलिसांनी अटक केली. या देशाचं संविधान मुस्लीम मुलांना त्यांच्याच महाविद्यालयातील कार्यक्रमात सहभागी होण्याची परवानगी देत नाही का?, असा प्रश्न या मुलांच्या पालकांनी केला आहे.
महाविद्यालयाला दंड
दरम्यान, कोविड प्रोटोकॉलचं उल्लंघन केल्याप्रकरणी महाविद्यालयाला दंड ठोठावण्यात आला आहे.
पोलिसांची कारवाई एकतर्फी?
१० ऑक्टोबर रोजी ही घटना घडली. अल्पसंख्यांक समाजातील चार तरुणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. पोलीस घटनास्थळी पोहचले तेव्हा तिथे जवळपास ५००० लोक जमा झाले होते. कार्यक्रम स्थळावर शांतता कायम राखण्यासाठी आम्ही चार तरुणांना अटक केली आणि महाविद्यालयाविरोधात एफआयआर दाखल केली, असं पोलिसांनी म्हटलंय. मात्र, पोलिसांनी बजरंग दलाच्या सदस्यांविरोधात कोणतीही कारवाई केलेली नाही.
गैर-हिंदूंना प्रवेश नाकारला
याअगोदरही रतलाममध्येही नवरात्री उत्सवाला धार्मिक रंग देण्यात आल्याचं समोर आलं होतं. रतलाममध्ये गैर-हिंदूंना प्रवेश नाकारण्यात येत असल्याचे पोस्टर्स लावण्यात आल्याचं समोर आलं. ‘हा खासगी कार्यक्रम होता’ असं सांगत पोलिसांनी या संदर्भात कोणतीही कारवाई न करण्यावर स्पष्टीकरण दिलं. ‘विश्व हिंदू परिषदे’कडून हे पोस्टर्स लावण्यात आले होते.