T-20 World Cup India vs Pakistan: दुबईत आज ‘हायहोल्टेज ड्रामा’; यावर निर्णय अवलंबून असेल
दोन्ही देशांतील तणावपूर्ण राजकीय संबंधांमुळे भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघात केवळ आयसीसीच्या स्पर्धांमध्येच लढत होत असते. त्यातच भारताची ‘मिशन वर्ल्ड कप’ची सुरुवात पाकिस्तानवरील विजयाने व्हावी, अशी भारतीयांची इच्छा आहे. याचवेळी पाकिस्तान वर्ल्ड कपमध्ये भारताला प्रथमच हरवण्याचे स्वप्न बाळगून आहे. त्यामुळे दुबईत ‘हायहोल्टेज ड्रामा’ अपेक्षित आहे. अर्थातच या लढतीच्यावेळी असलेल्या दबावाचा सामना कुठला संघ व्यवस्थित करतो, यावर निर्णय अवलंबून असेल.
वाचा- भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला फक्त काही तासांवर; कधी, कुठे आणि केव्हा पाहाल मॅच
आयपीएलचा फायदा
आयपीएल स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीतच (यूएई) झाली. भारतीय संघातील जवळपास सर्वच खेळाडू आयपीएलमध्ये खेळले. त्यामुळे येथील परिस्थितीची चांगली जाण भारतीय संघाला आहे. टी-२०मधील दबाव हाताळण्याची क्षमता प्रत्येक भारतीय खेळाडूमध्ये आहे. त्याचबरोबर रोहित शर्मा, लोकेश राहुल ही सलामी जोडी फॉर्मात असून, मधल्या फळीतील विराट, पंत, सूर्यकुमार यांच्यात मोठे फटके मारण्याची क्षमता आहे. क्षेत्ररक्षण, गोलंदाजी आणि फलंदाजी अशा तिन्ही पातळ्यांवर भारतीय संघ पाकिस्तानपेक्षा सरस आहे. मात्र, तरीही पाकिस्तानला कमी लेखण्याची चूक भारतीय संघ करणार नाही.
फिरकीतही स्पर्धा
भारताकडे फिरकी गोलंदाजीत रवींद्र जडेजा, आर. अश्विन, वरुण चक्रवर्ती, राहुल चहर असे चार पर्याय उपलब्ध आहेत. यात अष्टपैलू म्हणून जडेजाची निवड निश्चित मानली जात आहे. विशेष म्हणजे चारही फिरकी गोलंदाज चांगल्या फॉर्मात आहेत. सराव सामन्यातही त्यांनी आपली छाप पाडली आहे. आता संघ व्यवस्थापन दुसरा फिरकी गोलंदाज म्हणून कुणाला संधी देते, हे पाहणे रंजक ठरणार आहे.
शार्दूल की भुवी?
जसप्रीत बुमराह आणि महंमद शमी या वेगवान गोलंदाजांचे स्थान निश्चित मानले जात आहे. तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून भुवनेश्वरकुमार आणि शार्दूल ठाकूर यांच्यात स्पर्धा असेल. शार्दूल अष्टपैलू असल्याने त्याला संधी मिळाली, तर आश्चर्य वाटणार नाही. असेही आयपीएलमध्ये गोलंदाज म्हणून त्याने चमक दाखविली आहे.
पाकमध्ये सातत्याचा अभाव
न्यूझीलंड आणि इंग्लंडने पाकिस्तानचा दौरा टाळल्याने वर्ल्ड कपपूर्वी अपेक्षित सराव पाकिस्तानला मिळालेला नाही. भारताने वर्ल्ड कपपूर्वीच्या दोन्ही सराव सामन्यांत चमकदार कामगिरी केली. पाकिस्तानला मात्र पहिल्याच सराव सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून हार पत्करावी लागली. यानंतर दुसऱ्या सराव सामन्यात पाकिस्तानला विंडीजला नमविण्यात यश आले होते. मोहम्मद रिझवान, बाबर आझम, फखर झमान, महंमद हफीझ, शोएब मलिक असे चांगले फलंदाज पाककडे आहे. पाकिस्तानच्या गोलंदाजांसमोर भारताच्या फलंदाजांना रोखण्याचे आव्हान असेल.
नाणेफेकीचा कौल
नाणेफेक जिंकणाऱ्या कर्णधाराचे धावांचा यशस्वी पाठलाग करण्याचे लक्ष्य असेल. कारण या मैदानावर दवाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते. अर्थात, याच मैदानावर आयपीएलची फायनल झाली होती. त्यात धोनीच्या चेन्नई संघाने प्रथम फलंदाजी करताना विजय मिळविला. मात्र, यातील तेरा पैकी नऊ लढती धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने जिंकल्या आहेत. येथील सरासरी धावसंख्या १५६ आहे.
सामन्यातील निर्णायक लढती
१) लोकेश राहुल वि. शाहिन शाह आफ्रिदी
२) विराट कोहली वि. शादाब खान
३) जसप्रीत बुमराह वि. बाबर आझम
४) महंमद शमी वि. महंमद रिझवान
५) रवींद्र जडेजा वि. महंमद हफीझ