समाधान आवताडे यांच्या भविष्याची नव्हे तर जनतेच्या भविष्याचा फायदा करणारी ही निवडणूक- ना.नितीन गडकरी
मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी,दि. १४/११/२०२४ – तुम्ही हॉटेलमध्ये जेवायला जाताना हॉटेलवाल्याची जात पाहता का? दवाखान्यात जाताना डॉक्टरची जात पाहता का ? माणूस हा जातीने मोठा नसतो तर त्याच्या कर्तुत्वाने मोठा असतो.सर्वांना सोबत घेऊन आमदार समाधान आवताडे यांनी मतदारसंघाचा कायापालट केला आहे. ही निवडणूक समाधान आवताडे यांच्या भविष्याची नसून या मतदारसंघातील जनतेच्या भविष्याची आहे. त्यामुळे स्वतःचे भविष्य सुधारण्यासाठी येथील जनतेने समाधान आवताडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन केंद्रीय रस्ते उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. ते मंगळवेढा येथे आमदार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेमध्ये बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर माजी आमदार प्रशांत परिचारक, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित जगताप, लतीफ तांबोळी, भाजपचे सरचिटणीस शशिकांत चव्हाण, शिवानंद पाटील, सूर्यकांत ठेंगील, विजयकुमार देशमुख,रामेश्वर मासाळ, अंबादास कुलकर्णी, सोमनाथ आवताडे ,प्रवीण खवतोडे, ज्ञानेश्वर भगरे ,प्रकाश गायकवाड, शेतकरी संघटनेचे दीपक भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, आपला देश समृद्ध व्हावा ,अर्थव्यवस्था बळकट व्हावी यासाठी भाजप सरकार काम करत आहे. शिक्षण, आरोग्य ,रस्ते ही कामे सरकार प्राधान्याने करत आहे. काँग्रेस सरकारने ग्रामीण भागातील विकासाकडे दुर्लक्ष केले त्यामुळे ग्रामीण भाग विकासा पासून वंचित राहिला होता. मात्र भाजप सरकारने ग्रामीण भागातील शेतकरी व सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून काम सुरू केले आहे.या मतदारसंघामध्ये टेंभू म्हैसाळ योजनेची कामे पूर्णत्वास आणली आहेत. शेतकऱ्यांना पाणी मिळाले पाहिजे यासाठी वाटेल तेवढा खर्च करण्यास सरकार तयार आहे. काँग्रेसने लोकसभेच्या वेळी अपप्रचार करून जागा जिंकल्या. डॉ. बाबासाहेबांचे संविधान बळकट करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आम्ही संविधान बदलणार नाहीत पण कोणी बदलण्याचा प्रयत्न केला तर तेही बदलू देणार नाही. घटनेतील मूलभूत तत्वे बदलता येत नाहीत त्यामुळे जातीवादी राजकारण करणाऱ्या विश्वास ठेवू नका असे आवाहन नितीन गडकरी यांनी येथील मतदारांना केले.
यावेळी प्रास्ताविक करताना आमदार समाधान आवताडे यांनी मतदारसंघातील केलेल्या कामाचा आढावा सांगत शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर ठिबक सिंचन, शेततळे व सोलर पंप शासनाने द्यावा त्याचबरोबर बसवेश्वर बसवेश्वर स्मारकाचा प्रश्नही मार्गी लावण्याची मागणी केली.

व्यासपीठावरून बोलताना नितीन गडकरी यांनी प्रशांत परिचारक यांचे विशेष आभार मानत त्यांनी स्वतःच्या आमदारकीपेक्षा पक्ष निष्ठेला महत्त्व देत समाधान आवताडे यांना पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक केले.
इस देश में पैसे की कमी नहीं हैं,इस देश मे इमानदारी से काम करनेवालो की कमी है असे म्हणत नितीन गडकरी यांनी मी एकाही ठेकेदाराला माझ्या घरापर्यंत वर्क ऑर्डर घेण्यासाठी येऊ दिले नाही. मी गुणवत्तेला महत्त्व दिले असून जो ठेकेदार कामाची गुणवत्ता ठेवत नाही त्याला मी सोडत नाही असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.