nawab malik vs bjp: ‘हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांच्या १९ बंगल्यांबद्दल बोला’; भाजपचे मलिकांना आव्हान
हायलाइट्स:
- मलिक यांनी फडणवीस यांच्यावर केलेले आरोपांना ना शेंडा, ना बुडखा- केशव उपाध्ये.
- तुम्हाला खरंच चाड असेल तर अनिल देशमुख यांची कुंडली काढा- केशव उपाध्ये.
- तुमच्यात हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांच्या १९ बंगल्यांबद्दल बोला- केशव उपाध्ये.
‘हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर बोला’
मलिक यांच्या या खळबळजनक आरोपानंतर विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी टीकास्त्र सोडल्यानंतर आता भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनीही मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे. मलिक यांच्यावर टीकास्त्र सोडताना उपाध्ये म्हणाले की, एक फोटो दाखवायचा आणि वाटेल ती बेछूट आरोपांची राळ उडवायची, ना त्याला शेंडा ना बुडखा, ही नवाब मलिक यांची खासियत आहे. मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर असाच आरोप केला. तुम्हाला खरंच चाड असेल तर आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची कुंडली काढा, हिंमत असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhhav Thackeray) यांच्या १९ बंगल्यावर बोला, असे थेट आव्हान उपाध्ये यांनी मलिक यांना दिले आहे.
क्लिक करा आणि वाचा- राज्याला मोठा दिलासा! आज करोनाचे ८०९ नवे रुग्ण, मृत्यूसंख्येतही घट
हीच का पक्षाची धर्मनिरपेक्षता?
एनसीबीचे प्रादेशिक संचालक समीर वानखेडे हे मुस्लिम असल्याचे नवाब मलिक वारंवार सांगत आहेत. त्यावरही उपाध्ये यांनी ताशेरे ओढले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात जात, धर्माच्या नावाने एका कुटुंबाचे किती वाभाडे काढणार, हीच का पक्षाची धर्मनिरपेक्षता, असा सवाल उपाध्ये यांनी उपस्थित केला आहे.
क्लिक करा आणि वाचा- ‘आमच्याही हातात दगड असू शकतात’; संजय राऊत यांचा भाजपला इशारा
मराठा आरक्षणाची कशी वाट लावली ते सांगा. शेतकऱ्यांच्या तोंडाला कशी पाने पुसली ते सांगा. ओबीसी आरक्षण प्रकरणी ओबीसींना कसे फसवले तेही सांगा, असे एकावर एक मुद्दे उपस्थित करत उपाध्ये यांनी मलिक यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. आता उपाध्ये यांच्या या मुद्द्यांवर नवाब मलिक काय उत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
क्लिक करा आणि वाचा- ‘पाकिस्तानात बॉम्ब कधी फुटणार?’; मुख्यमंत्री ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार