सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा; आमदार अभिजीत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश


मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज – माढा मतदार संघातील विद्यमान आमदार अभिजीत धनंजय पाटील यांनी पावसाळी अधिवेशनात सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा प्रश्न अधिवेशनात मांडून आवाज उठविला असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.दि.१६ जुलै रोजी महसूल व वन विभाग, महाराष्ट्र शासनाने काढलेल्या शासन निर्णयानुसार सोलापूर जिल्ह्यात मे२०२४ मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे झालेल्या शेती नुकसानीसाठी राज्य शासनाने रु. ४४९.०६ लाखांचा निधी मंजूर केला आहे.


हा निधी २७४८ बाधित शेतकऱ्यांच्या १९७६.६७ हेक्टर क्षेत्रासाठी मंजूर करण्यात आला असून लाभार्थ्यांच्या थेट खात्यात DBT प्रणालीद्वारे रक्कम जमा केली जाणार आहे.या निर्णयामागे आमदार अभिजीत पाटील यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि शासन दरबारी प्रभावी मागणी महत्त्वाची ठरली.शेतकऱ्यांच्या मदतीसाठी त्यांनी वेळोवेळी विभागीय आयुक्त आणि महसूल विभागाकडे पाठपुरावा करून प्रशासनाच्या लक्षात ही गरज आणून दिली.

या निधीमुळे सोलापूर जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी सांगितले.

