आषाढी यात्रा सोहळा कालावधीत भाविकांना सेवा सुविधा पुरविण्यास सर्व यंत्रणांनी दक्ष रहावे-जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
पंढरपूर /जिमाका,दि.25 :- आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 06 जुलै 2025 रोजी होणार असून,या सोहळ्यासाठी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे 30 जून तर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे 01 जुलै 2025 रोजी सोलापूर जिल्ह्यात आगमन होणार आहे. तसेच अन्य पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या वारकरी भाविकांची पालखी मार्गावर,तळांवर तसेच रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व यंत्रणांनी दक्ष राहावे.वारी कालावधीत प्रत्येक विभागाला देण्यात आलेली जबाबदारीने व समन्वयाने व्यवस्थित पार पाडावी,अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या.

आषाढी यात्रा पुर्वतयारीबाबत केबीपी कॉलेज पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते,बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम,अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिकासिंह ठाकूर,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप कोहिनकर, प्रांताधिकारी अमित माळी,तहसिलदार सचिन लंगुटे,गटविकास अधिकारी सुशिल संसारे, मुख्याधिकारी महेश रोकडे तसेच पालखी सोहळ्यासाठी नियुक्त नोडल अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले,पालखी मार्गावर व तळांवर गेल्या वर्षी नियुक्त अधिकाऱ्यांना कोणत्या ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या त्या अडचणी पुन्हा यावर्षी येणार नाहीत याची दक्षता घेऊन आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.भक्ती सागर 65 एकर,वाखरी पालखी तळ या ठिकाणी पाणी वाटपाचे व्यवस्थित नियोजन करावे यासाठी चार ते पाच ठिकाणी निश्चित करून स्वयंसेवकाची नियुक्ती करावी. वाळवंटात हात गाडीवाले व मोकाट जनावरे येऊ नये यासाठी पोलीस प्रशासन व नगर पालिकेने योग्य ती दक्षता घ्यावी. वाखरी पालखीतळ भक्ती सागर (65 एकर) येथे गॅस सिलेंडर वाटप करताना गॅस सिलेंडरची तपासणी करावी त्यासाठी आवश्यक पथकांची नियुक्ती करावी.
सुलभ शौचालय स्वच्छ करण्यासाठी सक्शेन व सेटिंग मशीन वाहनांना विशेष वाहन म्हणून घोषित करण्यात आले आहे. या वाहनांना जाण्यासाठी कॉरिडॉर तयार करण्यात येणार असून यासाठी संबंधित नियुक्त अधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाच्या संपर्कात राहावे.मानांच्या पालखी सोहळ्या समवेत नियुक्त करण्यात आलेल्या नोडल अधिकाऱ्यांनी पालखी सोहळा प्रमुखांच्या संपर्कात राहावे जेणेकरून त्यांना आलेल्या अडचणी तात्काळ सोडवण्यात येतील हिरकणी कक्षात महिला कर्मचारी यांची नियुक्ती करावी व ते कर्मचारी कक्षात उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या.

मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम म्हणाले, वारकरी भाविकांच्या सुविधेसाठी चार्जिंग पॉइंट स्टेशन वेगवेगळ्या ठिकाणी लावावे जेणेकरून एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही.सुलभ शौचालयाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर चिखल होणार नाही याची दक्षता घ्यावी.पाण्याचे टँकर भरण्याच्या ठिकाणी अखंडित वीज पुरवठा ठेवावा.पालखी सोहळे मुक्कामाच्या ठिकाणी येण्यापूर्वी स्वच्छ असावीत तसेच पालखी सोहळे गेल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणची स्वच्छता करण्यात यावी अशा सूचना केल्या.
अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर म्हणाल्या, आषाढी यात्रा सोहळ्यासाठी पालखी मार्गावर तसेच पंढरपूर शहरात वारकरी भाविकांच्या सुविधेसाठी 27 आपत्कालीन केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत.पालखी सोहळे संबंधित आपत्कालीन केंद्राच्या कार्यक्षेत्रातून बाहेर पडेपर्यंत दक्ष राहावे. कोणतीही धोकादायक परिस्थिती उद्भवल्यास त्याचे निराकरणासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम कलम 34 ज अन्वये आवश्यक तो निर्णय घेऊन कारवाई करावी. चंद्रभागा नदीपात्रात आवश्यक त्या उपकरणासह प्रशिक्षक पथक तैनात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा नगर प्रशासन अधिकारी वीणा पवार यांनी आषाढी यात्रा कालावधीत नगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या स्वच्छता, पाणीपुरवठा सुलभ शौचालय उपलब्धता निर्जंतुकीकरण आधी बाबतची माहिती दिली.