आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना मोफत भोजन व्यवस्था-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना मोफत भोजन व्यवस्था– परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई ,१ जुलै- आषाढी एकादशी निमित्त श्री. क्षेत्र पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सेवेसाठी एसटीच्या ५२०० बसेसची व्यवस्था केली आहे. ह्या बसेस घेऊन येणारे चालक, वाहक त्यांची देखभाल करणारे यांत्रिक कर्मचारी व या सर्वांना मार्गदर्शन करणारे पर्यवेक्षक व अधिकारी यांच्या चहा, नाश्ता व जेवणाची व्यवस्था मोफत करण्यात आली आहे अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, गेली कित्येक वर्ष विठुरायाच्या भक्तांची सेवा एसटी व एसटीचे कर्मचारी सातत्याने करत आहेत. ऊन, वारा पाऊस याची तमा न बाळगता अतिशय निष्ठेने त्यांचे कर्तव्य ते बजावत असतात. आषाढी वारीच्या काळात त्यांच्या जेवणाची आभाळ होऊ नये, म्हणून यंदा स्वखर्चाने मी सलग तीन दिवस या सर्वांच्या चहा, नाश्ता व जेवणाची व्यवस्था (एकादशीला उपवासाचे पदार्थ) करीत आहे. या निमित्ताने माणसातील विठुराया ची सेवा करण्याची संधी मला मिळत आहे. अर्थात हे पुण्य पैशात मोजण्यासारखे नाही त्यामुळे दरवर्षी अशा प्रकारचा उपक्रम मी राबवणार आहे,असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले.

आषाढी वारीच्या काळात ५,६ व ७ जुलै रोजी चंद्रभागा बसस्थानक, भिमा बसस्थानक, विठ्ठल बसस्थानक व पांडुरंग बसस्थानक येथे सुमारे १३ हजार एसटी कर्मचारी या मोफत भोजन व्यवस्थेचा लाभ घेतील.

Leave a Reply

Back To Top