उद्याचे जग एआयवर नव्हे; ज्ञानोबा तुकोबांच्या मंत्रावर चालेल – विश्वास पाटील

उद्याचे जग एआयवर नव्हे; ज्ञानोबा तुकोबांच्या मंत्रावर चालेल — लेखक विश्वास पाटील

३० वी ज्ञानेश्वर तुकाराम स्मृती व्याख्यानमाला संपन्न; विज्ञान–अध्यात्माच्या संगमातून विश्वशांतीचा संदेश

पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३० नोव्हेंबर : आजचे जग एआयकडे धाव घेत आहे परंतु एआय तंत्रज्ञानाला मर्यादा आहेत. मानवी बुद्धिमत्ता, तत्वज्ञान आणि संतवाङ्मयाची दिशा उद्याच्या जगाला मार्गदर्शित करेल. त्यामुळे उद्याचे जग हे एआयवर नव्हे तर ज्ञानोबा-तुकोबांच्या मंत्रावर चालेल,असे विचार ज्येष्ठ लेखक आणि ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील यांनी मांडले.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र आळंदी, माईर्स एमआयटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३० वी तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर–तुकाराम स्मृती व्याख्यानमाला आज समारोपास आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विश्वास पाटील बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एमकेसीएल चे वरिष्ठ सल्लागार व शास्त्रज्ञ डॉ. विवेक सावंत होते. तसेच विश्वशांती केंद्राचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड,कार्याध्यक्ष डॉ.राहुल कराड, कुलगुरू डॉ.रविकुमार चिटणीस, प्र-कुलगुरू डॉ.मिलिंद पांडे,अधिष्ठाता डॉ.मिलिंद पात्रे आदी उपस्थित होते.

विशेष सत्कार व प्रकाशन

कार्यक्रमात प्रा.डॉ.विश्वनाथ कराड यांच्या विश्वशांतीसाठीच्या योगदानाचा विशेष सत्कार करण्यात आला.तसेच योगगुरू अनंत कोंडे व मारूती पाडेकर गुरूजी यांचाही गौरव करण्यात आला.

पीस स्टडीज तर्फे सेंटर फॉर एक्सलन्स इन संस्कृत अँड IRS स्टडीज या नव्या कोर्सच्या माहितीपत्रकाचे प्रकाशनही करण्यात आले.

विश्वास पाटील म्हणाले : जिजाऊंनी शिवाजी महाराजांना विश्वशांतीचा संदेश दिला.संतविचारांच्या प्रभावातून शक्ती, युक्ती आणि भक्ती यांचा संगम साधत स्वराज्य उभे राहिले. शिवाजी महाराजांनी मानवी जातीचे कल्याण केले म्हणून ते सर्वश्रेष्ठ राजे ठरले.

डॉ.विवेक सावंत म्हणाले : विज्ञान आणि अध्यात्म यांच्या तील अद्वैत ही संतपरंपरेची देणगी आहे. बहुविद्याशाखीय शिक्षणाची आज गरज असून त्यातूनच आत्मनिर्भर भारत घडेल. विद्यार्थ्यांनी ‘स्व’चा शोध घेतला तर त्यातूनच विश्वशांती प्रकट होते.

प्रा.डॉ.विश्वनाथ कराड यांचे मत : भारतीय संस्कृती,परंपरा आणि तत्त्वज्ञानाचा संदेश जगभर पसरविण्यासाठी या व्याख्यानमाला अत्यंत मोलाच्या आहेत. ज्ञानोबा–तुकोबा हे फक्त टाळकूट्यांचे विषय नाहीत तर ते समृद्ध जीवनाचे मार्गदर्शक आहेत.

कार्यक्रमाचे डॉ.आर.एम.चिटणीस यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ.मिलिंद पात्रे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ.मिलिंद पांडे यांनी आभार प्रदर्शन केले.

Leave a Reply

Back To Top