नवीन पिढीला प्रेरणा देणारे बंध – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे पोमै नागा समाजाच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्यात मार्गदर्शन
पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७ सप्टेंबर २०२५ –पोमै नागा त्सीदौमै मे पुणे या संस्थेच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्यात महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

ईशान्य भारत आणि महाराष्ट्राचे दृढ बंध
याप्रसंगी डॉ. गोऱ्हे यांनी ईशान्य भारत आणि महाराष्ट्रातील मैत्रीपूर्ण नातेसंबंध अधोरेखित केले.संस्थेच्या २५ वर्षांच्या वाटचालीला विश्वास,एकता आणि दृष्टी यांचा वारसा असे गौरवून समाजाच्या योगदानाचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
पुणे- दोन संस्कृतींना जोडणारा पूल
आपल्या भाषणात त्यांनी सांगितले की, ईशान्य भारताची संस्कृती, शिस्त आणि निसर्गाशी असलेले गाढ नाते भारताचे सौंदर्य अधिक खुलवतात तर महाराष्ट्र प्रगतशील विचार, शिक्षण व उद्योगासाठी प्रसिद्ध आहे.पुणे हे पूर्वेचे ऑक्सफर्ड म्हणून या दोन प्रदेशांना जोडणारा पूल ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.
वैविध्यपूर्ण समाज आणि पुण्याचे खुलेपण
पुणे आयटी,जैवतंत्रज्ञान, वैद्यकीय, कायदा व सर्जनशील क्षेत्रांचे उगवते केंद्र ठरत असून येथे प्रांत,भाषा वा धर्म न पाहता प्रतिभेला संधी मिळते,असे त्यांनी अधोरेखित केले. नागा समाजाच्या खाद्यसंस्कृती आणि पारंपरिक पोशाखांचे त्यांनी विशेष कौतुक केले.महाराष्ट्र सरकार या बंधांना बळकट करण्यासाठी कटिबद्ध असून सांस्कृतिक देवाणघेवाण, सुरक्षितता आणि समानतेला चालना देईल, असेही त्यांनी सांगितले.

भावनिक आणि सामाजिक जाणीवा
ईशान्य भारतातील वृद्ध पालक दूर असल्याने समाजातील सदस्यांना भेडसावणाऱ्या भावनिक आव्हानांची जाणीव व्यक्त करत त्या भागात वृद्धांसाठी आरोग्यसेवा अधिक उपलब्ध होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.पुण्यात किंवा महाराष्ट्रात वैद्यकीय आणीबाणी वा अडचणीच्यावेळी वैयक्तिकरित्या मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
युवकांसाठी प्रेरणादायी संदेश
भाषणाच्या शेवटी युवकांना मोठी स्वप्ने पाहा,संधी साधा आणि एकता,सेवा व उत्कृष्टतेची मूल्ये पुढे न्या असे प्रेरणादायी आवाहन डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले.
या कार्यक्रमाला जनरल सेक्रेटरी डॉ.एच. गिडीयन,पायोनियर श्री.एम.हेनी,संस्थापक डॉ.आर.बी.थोहे पू,पी.एम.जॉय चार्ल्स, दैखो रॉबिन,संयोजक सॅम्युएल हेशो बेमाई यांच्यासह समाजातील अनेक मान्यवर, आध्यात्मिक व व्यावसायिक क्षेत्रातील व्यक्ती तसेच आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.