आषाढी वारीचे यश हे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या नेटक्या नियोजनाचे फलित…

आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक परंपरेचा एक अविभाज्य भाग असून, ती केवळ एक धार्मिक यात्रा नसून सामाजिक सलोखा, शिस्त आणि एकात्मतेचे मूर्त स्वरूप आहे. या महत्त्वपूर्ण वारीचे यशस्वी आयोजन हे केवळ श्रद्धाळूंच्या सहभागावरच नाही तर प्रशासनाच्या सुसूत्र आणि सजग नियोजनावरही अवलंबून असते.दि.6 जुलै 2025 रोजी पार पडलेल्या आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर 26 जून ते 10 जुलै 2025 या कालावधीत झालेल्या वारीचे नियोजन हे सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखालील काटेकोर नियोजन व धाडसी निर्णयामुळे ही वारी अधिक सुसंगत, सुरक्षित आणि शिस्तबद्ध होऊन यशस्वी झाली.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या नेतृत्वाखाली आषाढी वारी 2024 ही यशस्वी झाली होती. या वारीत स्वच्छतेला अधिक प्राधान्य देऊन त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी झाल्याने वारकरी भाविक यांना चांगल्या सुविधा मिळाल्या होत्या. परंतु मागील वर्षीच्या वारीच्या अनुभवावर पालखी, दिंडया, पालखी महामार्ग, वाखरी पालखी तळ,65 एकर व पंढरपूर शहर या ठिकाणी देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांमध्ये सुधारणा करणे आवश्यक वाटल्याने जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी आषाढी वारी 2025 मध्ये त्या अनुषंगाने नियोजनबद्ध निर्णय घेऊन त्या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली व ती व्यवस्थितपणे होत आहे की नाही याची खात्रीही स्वतः फिल्डवर जाऊन केली.यावेळी गर्दीच्या ठिकाणी जाताना भाविकांना त्रास होऊ नये यासाठी त्यांनी पायी जात किंवा बाईकवर जाऊन देखरेख व नियंत्रण ठेवले. त्यामुळे वारकरी, भाविक यांना अधिक चांगल्या व वेळेत सुविधा देण्याची व्यवस्था अधिक तत्परतेने झाली.

उजनी धरणातील पाण्याचे नियोजन –
यावर्षी पावसाचे प्रमाण अधिक असल्याने तसेच उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्याने उजनी धरणात उपयुक्त पाणीसाठा जवळपास 73% झाला होता व भीमा नदीत पाणी सोडले जात होते त्यामुळे पंढरपूर येथे चंद्रभागा नदीला पूर परिस्थिती निर्माण होऊन संपूर्ण वाळवंट पाण्याखाली गेलेले होते.नीरा नदीचे पाणी व उजनी धरणातील पाण्याचे योग्य नियोजन करून चंद्रभागा नदी पात्रात पाणी आवश्यक त्या प्रमाणातच राहील यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद स्वतः लक्ष घालून या पाण्याचे नियंत्रण व नियोजन करत होते. त्यासाठी जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्कात राहून उजनी धरणातील सोडण्यात येणारे पाणी कमी करून यात्रा कालावधीत चंद्रभागा नदीचे वाळवंट भाविकांसाठी रिकामे राहील याची दक्षता त्यांनी घेतली.
व्हीआयपी दर्शन बंद –
श्री विठ्ठल रुक्मिणीच्या पद दर्शनासाठी वारकरी सर्वसामान्य भाविक मोठ्या प्रमाणावर दर्शन रांगेत किमान 15- 16 तास उभे राहतात.व्हीआयपी दर्शनामुळे हा कालावधी अधिक वाढू शकतो याचा अनुभव मागील वारी कालावधीत आलेला होता. त्यामुळे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा खूप मोठा व धाडसी निर्णय सर्वसामान्य भाविकां साठी घेतला.व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेणारे ते पहिलेच जिल्हाधिकारी ठरले.या निर्णयामुळे भाविकांमध्ये आनंदी वातावरण झाले तसेच पदस्पर्श दर्शनाचा कालावधी किमान पाच ते सहा तासांनी कमीही झाला.त्यामुळे दर्शन रांगेत उभा राहणाऱ्या लाखो भाविकांना याचा फायदा झाला.या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले. जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी हा निर्णय सर्वसामान्य वारकरी भाविक यांचे दर्शन लवकर व्हावे व त्यांना दर्शन रांगेत जास्त वेळ उभा राहावे लागू नये यासाठी कोणालाही न विचारता स्वतःच्या अधिकारात घेतला.मागील पन्नास वर्षापासून व्हीआयपी दर्शन बंद करण्याबाबतची फक्त चर्चा होत राहिली, परंतु जिल्हाधिकारी यांनी हा निर्णय घेऊन वारकऱ्यांचे व सर्वसामान्य भाविकांचे दर्शनाची वेळ खूप कमी केली, त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत असले तरी त्यांना या निर्णयाचा अप्रत्यक्षपणे त्रासही झाला.
नो व्हेईकल झोन –

अति महत्त्वाच्या व्यक्तींची वाहने थेट मंदिरा पर्यंत येत होती. त्यामुळे सर्वसामान्य भाविक वारकऱ्यांना खूप त्रास होत होता.चौफाळा ते मंदिर या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने अनुचित घटना घडण्याची शक्यताही नाकारता येत नव्हती.त्यामुळे चौफाळा ते मंदिर हा रस्ता नो व्हेइकल झोन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काढले. त्यामुळे मंदिर प्रदक्षिणा तसेच दर्शन घेऊन बाहेर पडणाऱ्या भाविकांना याचा फायदा झाला व पोलीस प्रशासनावरील ताणही कमी झाला. या निर्णयाचे वारकरी संप्रदाय व सर्वसामान्य नागरिकांनी कौतुक केले.परंतु याही धाडसी निर्णयाबाबत त्यांना त्रास झाला.

नामदेव पायरी ते चौफाळा रस्ता भाविकांसाठी वन वे :-
आषाढी वारीत नामदेव पायरी तसेच श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी मंदिर परिसरात खूप मोठी गर्दी भाविक करतात. चौफाळा ते मंदिर पर्यंत नो व्हेईकल झोन केला तरी मंदिर प्रदक्षिणा करणाऱ्या भाविकांची संख्या खूप मोठी असते. मंदिरातून दर्शन घेऊन जाणारे भाविकही बाहेर पडतात त्यामुळे येथे वारकऱ्यांची भाविकांची लाखोंची संख्या असते. यामुळे या ठिकाणी चेंगराचेंगरी होण्याचीही शक्यता असते म्हणून नामदेव पायरी ते चौफाळा हा रस्ता पायी चालत जाणाऱ्या भाविकांसाठीही वनवे करण्यात आला. त्यामुळे पोलीस विभागाला गर्दीवर योग्य नियंत्रण ठेवणे शक्य झाले व यातून कोणत्याही प्रकारची अनुचित घटना होण्यापासून टाळण्यात प्रशासनाला यश मिळाले.

आषाढीसाठी भाविकांचे गर्दीचे रेकॉर्ड –
आषाढी वारी 2025 मध्ये प्रशासनाने अनुमान लावल्या प्रमाणे 20 ते 22 लाख पंढरपूरमध्ये दाखल झालेले होते. कारण यावर्षी पाऊस वेळेपूर्वी झालेला होता व शेतकरी वर्गांच्या बहुतांश पेरण्याही पूर्ण झालेल्या होत्या त्यामुळे वारीला मोठी गर्दी होईल याची अपेक्षा प्रशासनाने केलेली होती व त्यानुसारच नियोजनही केलेले होते.विठ्ठल रुक्मिणी च्या पददर्शनाची रांग गोपाळपुराच्या पुढे गेलेली होती.ही रांग आणखी खूप पुढे जाण्याची शक्यता होती.एक तर पंढरपूर मध्ये आलेल्या भाविकांना दर्शन रांगेत पोहोचण्यासाठी सात आठ किलोमीटर प्रवास करावा लागत होता.त्यामुळे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पुढाकार घेऊन गोपाळपूरजवळ एक जर्मन हंगर टेन्ट व तिथून सातशे मीटर अंतरावर एका शेतकऱ्याच्या शेतात दुसरा जर्मन हंगर टेन्ट रातोरात उभा करून घेतला.पहिल्या टेन्ट मध्ये दीड किलोमीटरची रांग तर दुसऱ्या टेन्ट मध्ये अडीच किलोमीटरची दर्शन रांग ॲडजेस्ट करण्यात आली.दर्शन रांगेत देण्यात येणाऱ्या सर्व सोयीसुविधा त्यांच्या बाहेर एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्या तसेच पोलिसांनाही या ठिकाणी नियंत्रण ठेवणे शक्य झाले व भाविकांनाही याचा खूप मोठा लाभ झाला.जवळपास चार किलोमीटरच्या दर्शन रांगेचे टेंटच्या माध्यमातून व्यवस्थापन करण्यात जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
पंढरपूर शहरातील अतिक्रमणे काढली –
आषाढी वारी 2025 च्या अनुषंगाने पंढरपूर शहरात श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी वीस लाखापेक्षा अधिक भाविक येण्याची शक्यता प्रशासनाने गृहीत धरली होती त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पंढरपूर शहरातील सर्व रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्याबाबत उपविभागीय अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी व पंढरपूर नगरपरिषद यांना निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने शहरातील सर्व अतिक्रमणे काढून रस्ते मोकळे व प्रशस्त करण्यात आल्यामुळे भाविकांना अतिक्रमणाचा कोणताही त्रास होणार नाही व गर्दीवर नियंत्रणासाठीही हा निर्णय महत्वपूर्ण ठरला. पालखी मार्ग ,पालखीतळ या ठिकाणीही झालेली अतिक्रमणं काढून टाकण्यात आली तसेच पंढरपूर शहर व पालखी मार्गावरील अवैध होर्डिंग काढून घेण्यात आले तसेच असे होर्डिंग्स पुन्हा कोणी उभे केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

पालखी तळ सुविधा –
श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या मार्गावरील पालखी तळ तसेच विसावा या ठिकाणी पावसामुळे चिखल होऊ नये यासाठी मागील वर्षीच्या अडीच पट मुरमीकरण करण्यात आले.तळा वरून शौचालयास जाण्यासाठीही रस्त्यावर मुरमीकरण करण्यात आले.पालखीतळा वर 94 वॉटरप्रूफ तर 11 जर्मन हँगर मंडप उभारण्यात आले.यातून 7 लाख 85 हजार चौरस फूट जागा उपलब्ध झाली जी मागील वर्षी तीन लाख 12 हजार चौरस फुटाचे वॉटरप्रूफ मंडप टाकण्यात आलेले होते. मागील वर्षीच्या अडीच पट जास्त वॉटरप्रूफ मंडप टाकण्यात आलेले होते. संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोबत पाच मोबाईल चार्जिंग व्हॅन देण्यात आलेल्या होत्या.पालखी मार्गावर वीस ठिकाणी बीएसएनएलच्या मदतीने टेलिफोन स्टॅन्ड उभारण्यात आले होते याद्वारे वारकरी आपल्या नातेवाईकाच्या संपर्कात राहू शकत होते.
स्वच्छता –
मागील वर्षी प्रमाणे याही वर्षी आषाढी वारीत स्वच्छतेला खूप मोठे प्राधान्य देण्यात आलेले होते.मागील वर्षीचा अनुभव लक्षात घेऊन यावर्षी ॲडव्हान्स मोबाईल टॉयलेट सिस्टीम उभी केलेली होती. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीसाठी 3600 मोबाईल टॉयलेट तर जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीसाठी 2400 मोबाईल टॉयलेट चा पुरवठा करण्यात आला होता.हे सर्व टॉयलेट सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत व सर्व पालखीतळावर पोहोचवण्यासाठी मोबाईल टॉयलेट सिस्टीम चा वापर करण्यात आला.यासाठी एका उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करून त्याच्या अधिनस्त अधिकारी कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देण्यात आला होता. पालखी तळावर मुक्कामाला येण्यापूर्वीच मोबाईल टॉयलेटची व्यवस्था तसेच त्यासाठी आवश्यक असलेला पाणीपुरवठा व सफाई कर्मचार्यांची उपलब्धता केली जात होती, त्यामुळे कोठेही अस्वच्छता निर्माण झाली नाही.
पालखी मार्ग, पंढरपूर शहर, वाखरी तळ तसेच 65 एकर या भागात मोबाईल टॉयलेट वारकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आलेले होते.या टॉयलेटची वेळोवेळी स्वच्छता करण्यासाठी सफाई कर्मचारी,पाण्याची व्यवस्था उपलब्ध केलेली होती.वारी कालावधीत पालखी मार्ग,पंढरपूर शहरात कोणत्याही प्रकारची अस्वच्छता निर्माण होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्वतः पुढाकार घेऊन सफाई कर्मचाऱ्यांचे सुपरवायझर,नगर पालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे व पंचायत समितीचे बिडीओ सुशिल संसारे यांच्या तीन ते चार बैठका घेतल्या. यात त्यांना त्या त्या भागातील शौचालयाचे नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले.या माध्यमातून सुपरवायझर वर खूप मोठे नियंत्रण निर्माण करून त्यांच्यामार्फत सफाई कर्मचाऱ्याकडून टॉयलेटची स्वच्छता राबवली गेली.जर कोठेही अस्वच्छता राहिली तर संबंधित भागाचे सुपरवायझरवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आलेले होते. त्यामुळे सुपरवायझर यांनी संबंधित सफाई कर्मचारी यांच्याकडून टॉयलेटची स्वच्छता उत्तम प्रकारे करून घेतली व संपूर्ण पंढरपूर शहर तसेच पालखी मार्गावर चांगली स्वच्छता राहिली यात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलेले सूक्ष्म नियोजन खूप महत्वपूर्ण ठरले.

सक्शन व जेटिंग मशीन साठी कॉरिडॉर –
पंढरपूर शहर तसेच पालखी मार्गावर मोबाईल टॉयलेट मधील मैला काढून घेऊन दुसरीकडे डम्प करण्यासाठी सक्शन व जेटिंग मशीन वारकऱ्यांच्या गर्दीतून बाहेर काढण्या साठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी तसेच पंढरपूर नगरपरिषद त्यांच्याशी समन्वय ठेवून कॉरिडॉर तयार करण्यात आला. त्यामुळे ही वाहने गर्दीतून बाहेर काढणे व त्या भागाची स्वच्छता राखणे प्रशासनाला शक्य झाले. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्वतः पुढाकार घेऊन शौचालयाची व्यवस्था केलेल्या प्रत्येक ठिकाणी दि.3,4,5 व 6 जुलै रोजी स्वच्छतेची पाहणी केली.ज्या ठिकाणी अस्वच्छता राहिली आहे त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना त्याबाबतचे निर्देश दिले त्यातून स्वच्छतेच्या अनुषंगाने खूप मोठा संदेश सर्व ठिकाणच्या सफाई कर्मचाऱ्यांमध्ये गेला. जिल्हाधिकारी महोदयांनी गर्दीची परिस्थिती पाहता काही ठिकाणी पायी जाऊन तर काही ठिकाणी बाईकवर जाऊन पाहणी केली.

आरोग्य सुविधा –
वारकऱ्यांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी पालखी मार्ग पालखी स्थळ असे फिल्डवर 25 ICU कक्ष स्थापन करण्यात आले. सोलापूर जिल्ह्याच्या बाहेरून 100 स्पेशालिस्ट डॉक्टरची सेवा वारीसाठी घेण्यात आली. यामध्ये बालरोग,स्त्रीरोग व अस्थिरोग तज्ञ अशा विविध आजारावरील तज्ञांचा समावेश होता. आरोग्याच्या सुविधा निर्माण करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमध्ये 3 कोटी 50 लाखाचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.वारकऱ्यांच्या सेवेसाठी 121 ॲम्बुलन्स बाईक तसेच पालखी मार्ग पालखी तळ या ठिकाणी 143 किरकोळ आजारावर उपचारासाठी आरोग्य सेवा कक्ष निर्माण केलेले होते.पालख्यांसाठी 4500 मेडीकल किट वाटप करण्यात आलेले होते.
आपत्ती व्यवस्थापन –
वारी कालावधी गर्दीचे योग्य नियंत्रण होणे आवश्यक होते त्या अनुषंगाने 13 हॉटस्पॉट शोधण्यात आले व प्रत्येक हॉटस्पॉटवर पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले होते. पोलीस टीम सोबत या ठिकाणी एक ICU कक्ष निर्माण करण्यात आला. या स्पॉटवर कोणतीही अनुचित घटना होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही केली जात होती.
एकात्मिक नियंत्रण कक्ष –
पंढरपूर शहर पोलीस स्टेशनच्या जवळ वारी कालावधीत सर्व शासकीय विभाग प्रमुखां साठी इंटिग्रेटेड कंट्रोल रूम निर्माण केलेली होती.या अंतर्गत तुझी सेवा असलेले 100 नोकिया फोन संबंधित कार्यालय प्रमुखांना देऊन वारी कालावधी परस्पर संवाद व समन्वय यासाठी याचा वापर करण्यात आला,त्यातून सर्व संबंधित विभागात समन्वय चांगला होऊन वारकऱ्यांना अधिक तत्परतेने सेवा देणे सुलभ झाले. या ठिकाणी 280 सीसीटीव्ही च्या माध्यमातून संपूर्ण पंढरपूर शहरातील फीड मिळत होते. त्यामुळे अत्यंत गतीने निर्णय घेणे शक्य झाले व यातून कोणताही अनुचित प्रकार घडून येण्यासाठी करडी नजर ठेवली जात होती. प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी 50 ठिकाणी मोफत वायफाय ची सुविधा उपलब्ध केली होती.
होडी चालक नोंदणी अनिवार्य –
चंद्रभागा नदी जल प्रवासी वाहतूक करणाऱ्या प्रत्येक होडी चालकाची नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले होते.
यासाठी जिल्हाधिकारी आशीर्वाद, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी संबंधित होडी चालक यांच्या समवेत किमान तीन ते चार बैठका घेऊन त्यांना विविध मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या.190 होडींची नोंद प्रशासनाकडे झाली, त्या सर्व होडी चालकांनी सर्व होडी व्यवस्थित असल्याचे प्रमाणपत्र देणे बंधनकारक होते.प्रत्येक होडी मध्ये वीस प्रवासी प्लस दोन होडी चालक असे 22 व्यक्तींनाच जलप्रवास करणे अनिवार्य करण्यात आलेले होते.
जलप्रवास करताना प्रत्येक होडीवर लाईफ जॅकेट आणि वारे होते. जिल्हा प्रशासनाच्या वतीने 1000 लाईफ जॅकेट होडीच्या लोकांना पुरवण्यात आलेले होते.चंद्रभागा नदीपात्रात सहा ठिकाणी जेटी पॉइंट तयार केले होते.या प्रत्येक पॉईंट मधूनच जल वाहतूक करण्याचे बंधन होडीच्या लोकांना घालण्यात आलेले होते. त्यामुळे पोलीस विभागामार्फत जल प्रवासी वाहतूक व होडी चालक यांच्यावर योग्य नियंत्रण ठेवणे खूप सुलभ झाले. यासाठी 16 पोलीस कर्मचारी नियुक्त केलेले होते. प्रशासनाच्या वतीने मागील वर्षीच्या नऊ लाईफ बोटी मध्ये वाढ करून एकूण 22 लाईफ बोटी चंद्रभागा नदीपात्रात ठेवण्यात आलेल्या होत्या यावर २६४ पट्टीचे पोहणारे व प्रशिक्षित व्यक्तींची नोंदणी नियुक्ती करण्यात आलेली होती यामध्ये एनडीआरएफचे जवान तसेच कोल्हापुर येथील 75 पोहणारे युवक तर पंढरपूर शहरातील कोळी समाजाचे पट्टीचे पाहणारे 50 युवक मानधनावर कार्यरत होते. मागील एका आठवड्यात नदीच्या पाण्यात बुडणाऱ्या 23 व्यक्तींचा बचाव या पथकाकडून करण्यात आलेला होता. या 23 व्यक्तींना मिळालेले जीवनदान हे जिल्हा प्रशासनाने केलेल्या काटेकोर नियोजनाचे फलित होते.
गॅस सिलेंडरचा पुरवठा –
सोलापूर जिल्ह्याचे हद्दीत पालखी मार्गावर मुक्कामाचे ठिकाणी वाखरी पालखीचे तसेच 65 एकर या भागात थांबणाऱ्या वारकऱ्यांसाठी प्रशासनाच्यावतीने गॅस सिलेंडरचा पुरवठा करण्यात आला.यासाठी सर्व संबंधित गॅस एजन्सीची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शक सूचना दिलेल्या होत्या. प्रत्येक गॅस बिल्डरवर ग्रीन स्टिकर अनिवार्य करण्यात आलेले होते. सर्व सिलेंडर वापरण्यास योग्य असल्याबाबतचे प्रमाणपत्रही संबंधित गॅस एजन्सीकडून घेण्यात आले होते. त्यामुळे गॅस लिकेज होऊन कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतलेली होती.
वाखरी पालखी तळ –
पंढरपूर शहरापासून जवळ असलेला वाखरी पालखीतळ हा सर्व मानांच्या पालखीसाठी महत्त्वाचा तळ आहे. या ठिकाणी सर्व मानाच्या पालख्या मुक्कामी असतात. त्यामुळे या पालखी तलावर सर्व प्रकारच्या सोयीसुविधा चांगल्या असाव्यात यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी स्वतः लक्ष घालून सुविधांची खात्री केलेली होती.या पालखीतळावर अंतर्गत रस्ते यासाठी एक कोटीचा निधी वापरण्यात आलेला होता.पाऊस आला तर या ठिकाणी चिखल होणार नाही या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण केलेली होती तसेच आवश्यक तेवढे मोबाईल टॉयलेट उपलब्ध केलेले होते.या ठिकाणी स्वच्छता राहील यासाठी पुरेसे मनुष्यबळ तसेच पाणीपुरवठा व्यवस्था केलेली होती.
महिलांसाठी विशेष सुविधा –
सर्व पालखी मार्ग,पालखी तळ,वाळवंट, वाखरी तसेच 65 एकर व पंढरपूर शहरात महिलांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले होत्या.महिलांसाठी स्वतंत्र 2250 स्नानगृहे उपलब्ध केलेली होती. जिल्ह्यात 155 अहिल्यादेवी होळकर हिरकणी कक्ष निर्माण केले होते. या अंतर्गत स्तनदामातांसाठी विशेष सुविधा उपलब्ध केली होती. त्याच ठिकाणी महिलांसाठी मोफत सॅनिटरी पॅड ची व्यवस्था करून प्रत्येक हिरकणी कक्षामध्ये आरोग्य सेविकांची नियुक्ती केलेली होती.या प्रकारे जिल्हा प्रशासनाने संपूर्ण वारी कालावधीत महिलांना विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या.
पाणी पुरवठा –
वारी कालावधीत संपूर्ण पालखी मार्ग पालखी तळ पालखीचे मुक्काम ठिकाणी पिण्याचे पाणी व सांडपाणी पुरवठा नियोजन प्रशासनाने अत्यंत चोखपणे केलेले होते त्यामुळे कोठेही कोणत्याही प्रकारची अस्वच्छता निर्माण झालेली नाही. पिण्याच्या पाण्याचे 852 स्त्रोत ठरवून 134 ठिकाणी टँकर फीडिंग पॉईंट निर्माण केलेले होते. वारी सुरू होण्यापूर्वी एक ते दीड महिना अगोदर पासूनच पाणी फीडिंग पॉईंट मधील पाणी स्त्रोताची तीन ते चार वेळा टेस्ट घेण्यात आली.पाण्याच्या शुद्धीकरणाला व क्लोरिनेशन ला महत्त्व देण्यात आले.प्रत्येक वारकऱ्याला स्वच्छ पाणीपुरवठा जिल्हा प्रशासनाच्या यशस्वी नियोजनातून करण्यात आला.
वाखरी ते पंढरपूर महामार्गाची दुरुस्ती –
वाखरी ते पंढरपूर या पाच किलोमीटर रस्त्याचे काम अपूर्ण होते.या महामार्गाच्या दुरुस्तीसाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक,उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी यांच्यासमवेत चार ते पाच वेळा पाहणी केली त्यातून 35 पॅच शोधण्यात आले.या सर्व पॅच ची दुरुस्ती करणे, मुरमीकरण करणे, स्लोप
देण्याचे काम करणे आदी कामावर स्वतः जिल्हाधिकारी यांनी लक्ष ठेवून ही कामे संबंधित यंत्रणांकडून करून घेतली.या पूर्ण कामामुळे वारी कालावधीत वारकरी,भाविकांना कोणताही त्रास होणार नाही तसेच या मार्गावर अपघात होणार नाही या दृष्टीने प्रशासनाने पॅचवर्क उत्कृष्टपणे केले.
पंढरपूर शहर तसेच वाखरी तळ व 65 एकर येथे सजावट –
यावर्षी पंढरपूर शहरात वैशिष्ट्यपूर्ण प्रकारच्या सहाशे पन्नास लाईटचे पोल लावून शहरात रात्रीच्या वेळी प्रकाशयोजना केलेली होती.यासाठी पंढरपूर नगरपरिषदेला नियोजन समितीतून एक कोटी पंचाहत्तर लाखाचा निधी उपलब्ध केलेला होता. पालखी मार्ग व पालखी तळावर वारकरी भाविकांच्या व पालख्यांच्या स्वागतासाठी मोठमोठे आकर्षक कमानी केलेल्या होत्या. पंढरपूर शहरात येणाऱ्या वारकरी व भाविकांना दिशादर्शक चिन्ह व नकाशाच्या माध्यमातून माहिती मिळावी यासाठी आवश्यक त्या उंचीवर व मोठ्या आकारात माहिती देण्यात आलेली होती. पंढरपूर शहरात आलेल्या वारकरी व भाविकांना भजन व कीर्तन करता यावे यासाठी 150 ठिकाणी लाऊड्स स्पीकरची व्यवस्था केलेली होती.वाखरी पालखी तळावर मोठ्या प्रमाणावर वृक्ष आहेत या वृक्षावरही तसेच तळावर व 65 एकर येथे आकर्षक अशी विद्युत प्रकाश व्यवस्था केलेली होती त्यामुळे संपूर्ण पंढरपूर शहर एक आकर्षक विद्युत प्रकाश योजनेने उजळून निघालेले होते.
मटन चिकन विकण्यास प्रतिबंध –
पंढरपूर शहरात दि.30 जून 2025 ते 12 जुलै 2025 या कालावधीत मटण चिकन विकण्यास प्रतिबंध घालण्यात आलेला होता. यासाठी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी मनाई आदेश दिलेले होते.पालखी मार्गावर पालखी मुक्कामी असलेल्या गावांमध्येही मटन चिकन विक्री बंदी होती. त्याप्रमाणेच दारूबंदीचे आदेशही दिलेले होते. पंढरपूर शहरात दिनांक पाच ते दहा जुलै 2025 या कालावधीत दारूबंदी आदेश तर पालखी मार्गावर पालखीच्या मुक्कामाच्या दिवशी दारूबंदी करण्यात आलेली होती. हे आदेश भंग करणाऱ्या विरोधात कठोर कारवाई करण्याबाबतचे निर्देशही देण्यात आलेले होते.
आषाढी वारी 2025 यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सर्व संबंधित शासकीय विभाग प्रमुख यांच्याशी चांगला समन्वय ठेवला.यासाठी मागील दोन महिन्यापासून जिल्हाधिकारी यांनी 53 बैठका घेतल्या. वारी कालावधीत विविध प्रतिबंधात्मक आदेश काढले. वारकऱ्यांच्या सोयीसाठी अनेक चांगले आदेश काढले,असे आदेश काढून जिल्हाधिकारी थांबले नाहीत तर या आदेशाची अमलबजावणी संबंधित यंत्रणा कडून योग्य पद्धतीने होत आहे की नाही याची खात्री स्वतः जाऊन केली.वारकऱ्यां साठी वाळवंट रिकामे रहावे यासाठी उजनीतून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे नियोजन ते 20 जून पासून करत होते.म्हणून यात्रा कालावधीत भीमा नदी पात्रात मर्यादित पाणी प्रवाह ठेवून वाळवंटाचा वापर वारकऱ्यांसाठी करता आला.पालखी मार्ग, पालखी तळ, पंढरपूर शहरातील स्वच्छता, सर्व सोयी सुविधा याची खात्री जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद स्वतः करत असल्याने प्रत्येक कामात एक सुसूत्रता राहिली.
उपरोक्त सर्व बाबीच्या अनुषंगाने या वर्षीच्या आषाढी वारीत सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाने उत्कृष्ट नियोजन केले.6 जुलै 2025 रोजी आषाढी एकादशी झाली. विविध विभागांमध्ये समन्वय साधून, आरोग्य पाणीपुरवठा, आपत्ती व्यवस्थापन, गर्दीवर नियंत्रण, वैद्यकीय सुविधा, स्वच्छता, आणि वाहतूक, भाविकांना सुलभ दर्शन व्यवस्था यांसारख्या क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्यात आली. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे कागदावरच निर्णय व आदेश काढून थांबले नाहीत तर त्या आदेशाची व निर्णयाची प्रत्यक्ष अमलबजावणी केली. ज्यामुळे यंदाची आषाढी वारी ही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्या शिस्तबद्ध आणि लोकाभिमुख व्यवस्थापनाचा एक उत्कृष्ट नमुना ठरली आहे.
सुनील सोनटक्के जिल्हा माहिती अधिकारी ,सोलापूर
