नगररचना योजनेमध्ये बाधित विस्थापित धारकांना अर्ज करण्यासंबंधी मुदतवाढ
पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,१६/०७/२०२५- शहरातील नागरिकांना कळविण्यात येते की, जिल्हाधिकारी सोलापूर यांनी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय येथे दि.1 व 2 मे 2025 रोजी पंढरपूर शहरांमध्ये राबविण्यात येणाऱ्या विकास आराखड्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकी मध्ये सन १९८२ मध्ये श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरामध्ये नगररचना योजना राबविण्यात आली होती पण विस्थापित नगर येथे बाधित मालमत्ताधारकांना प्लॉट मिळाले नाहीत,प्लॉटच्या खरेदीही दिल्या नाहीत अथवा आर्थिक मोबदला मिळाला नाही अशा तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या यास अनुसरून सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी पंढरपूर उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केलेली आहे.

नगररचना योजनेमध्ये ज्या बाधित मालमत्ता धारकांना लाभ मिळाला नाही अशा मालमत्ताधारकांना आवश्यक कागदपत्रासह अर्ज करणेस मुदत देण्यात आली होती. तथापि अजूनही कोणी विस्थापित अर्ज करावयाचे राहिले असतील तर त्यांना पुन्हा अर्ज सादर करणेसाठी संधी देऊन मुदत वाढविण्यात आलेली आहे. त्यांनी दि. २६/७/२०२५ पर्यंत मुख्याधिकारी पंढरपूर नगरपरिषद यांच्याकडे अर्ज सादर करावेत. तसेच यापूर्वी अर्ज सादर केलेल्या विस्थापितांना अपुऱ्या कागदपत्राबाबत त्रुटीपत्र देण्यात आलेले आहे त्यांनी त्रुटी पत्रानुसार आवश्यक कागदपत्रे मुख्याधिकारी नगरपरिषद पंढरपूर यांच्याकडे सादर करावेत आहे आवाहन उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी केले आहे जेणेकरून आलेल्या अर्जावर योग्य ती कार्यवाही करता येईल.