मंत्री गिरीश महाजन यांच्या विठ्ठल सेवेने भारावला राज्यातील वारकरी,मंत्री की सेवेकरी ? प्रश्न विठ्ठल भक्तांना
पंढरपूरच्या वारीत गिरीश महाजन यांचं निस्सीम समर्पण चर्चा मंत्री गिरीश महाजन यांच्या त्या १७ तासांच्या कामगिरीची
मुंबई,दि.९ जुलै २०२५: आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूर नगरी भक्तीमय वातावरणाने भारलेली असतानाच यंदा लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेला नव्या भक्ति प्रेरणेची जोड मिळाली ती म्हणजे मंत्री रूपी सेवेकरी गिरीश महाजन यांचं प्रेरणादायी रूप.मंत्री गिरीश महाजन यांच्या याच प्रेरणादायी विठ्ठल सेवेने राज्यातील वारकरी भारावला असून आता सर्वत्र चर्चा होत आहे, ती मंत्री गिरीश महाजन यांच्या त्या १७ तासाच्या कामगिरीची.
राज्याचे जलसंपदा मंत्री आणि आपत्ती व्यवस्थापनाचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन यांनी यंदाच्या वारीत एक वेगळाच इतिहास घडवला.त्यांनी ५ जुलै च्या मध्यरात्रीपासून ते ६ जुलै सायंकाळपर्यंत तब्बल १७ तास अखंड न थकता,न थांबता सेवा दिली.कुठलाही राजकीय आव न आणता साध्या पोशाखात हातात वॉकी- टॉकी आणि मुखात पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी हे नामस्मरण करत ते वारकऱ्यांच्या सेवेत रमले होते.

सेवेची साक्षात उपासना
वारीच्या दिवशी रविवारी पंढरपूरच्या महाद्वार परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी होती. लाखोंच्या संख्येने वारकरी दाखल झाले होते, या गर्दीचे नियंत्रण मार्गदर्शन आणि समन्वय साधण्यासाठी गिरीश महाजन स्वतः पहाटे ५.३० वाजता टॉवरवर चढले आणि सायंकाळी ५ पर्यंत तेथूनच सतत सेवा करत राहिले.स्वतः पोलिस, अधिकारी व आपत्कालीन यंत्रणांशी संवाद साधत होते,सूचना करीत होते.काही वेळा ते थेट मैदानात उतरून दिशाभूल झालेल्या वारकऱ्यांना मार्गदर्शन करताना दिसले. हे दृश्य पाहून अनेक वारकरी थक्क झाले. कोणी म्हणाले,हा सेवेकरी खरेच मंत्री आहे का ? तर अनेकांनी त्यांच्या हातात जेवण आणि पाण्याच्या बाटल्या देत कृतज्ञतेचा भाव व्यक्त केला.
सेवेचा संदेश,व्यवस्थापनाचे यश
मंत्री गिरीष महाजन हे जरी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मंत्री असले तरी त्यांनी आपत्तीच्या काळातली तत्परता इथेही सेवाभावाने दाखवून दिली.तेथील पोलीस अधिकारी, कर्मचारी,स्वयंसेवक यांनाही गिरीष महाजन यांचा उत्साह प्रेरणा देत होता.वारकरी भक्तांसाठी ही केवळ सेवा नव्हे तर त्यांच्या श्रद्धेला प्रशासनाकडून मिळालेली सच्ची मान्यता होती.वारीतून मिळालेला खरा मंत्र गिरीश महाजन यांचे हे सेवाभावाचे रूप हे फक्त एक कर्तव्य नव्हे तर नेतृत्वाची सच्ची व्याख्या आहे.आजच्या काळात राजकारण आणि सेवा या दोन संकल्पनांमध्ये मोठे अंतर दिसते मात्र महाजनांनी त्या दोघांमध्ये पूल बांधला.वारकऱ्यांसाठी ही केवळ एक अनुभूती नव्हे तर एक संदेश आहे- सेवा हीच खरी भक्ती आणि व्यवस्थापन हीच खरी उर्जा
मंत्री गिरीश महाजन यांच्या या विठ्ठल भक्तीने अनेक वारकर्यांना कुतुहल वाटत होते. रविवारी दि.6 जुलै रोजी आषाढी एकादशी असल्याने मंत्री गिरीश महाजन हे तीन दिवस अगोदर म्हणजेच शुक्रवार पासूनच पंढरपुरात दाखल झाले होते.त्यांनी विविध यंत्रणांचा आढावा घेत प्रत्यक्ष पाहणी केली.शासकीय यंत्रणांचे नियोजन तपासले,वारीत होणारा गर्दीचा उच्चांक लक्षात घेता सर्वांना सूचना दिल्या. मुख्यमंत्र्यां सह अनेक मंत्रीगण देखील दाखल झाले होते.गिरीश महाजन यांनी वारकऱ्यांची सेवा करून आपले विठ्ठल प्रेम वारकऱ्यांच्या मनात निर्माण केले आहे. गेल्या वर्षी मंत्री गिरीश महाजन यांनी वारकऱ्यांची विविध पातळीवर सेवा केली. अनेकांना तर मंत्री गिरीश महाजन यांचे हे सेवाभावाचे रूप पाहून त्यांना संकटमोचक का ? म्हणतात याचे जणू कोडे उलगडले आहे. विधानसभेचे पावसाळी अधिवेशन चालू असून आपल्या व्यस्त कार्यक्रमात वारकऱ्यांमध्ये मिसळून केलेली ही विठ्ठलसेवा विधानभवनात देखील सर्व आमदार, मंत्र्यांमध्ये चर्चेचा विषय बनली.
सलग दोन दिवस लाखो वारकऱ्यांच्या सेवेत राहून विठुरायाची भक्ती करण्याचे सौभाग्य मला लाभल्याने मी धन्य झालो.या अविरत सेवेने वेगळी सकारात्मक ऊर्जाही निर्माण झाली, वारक-यांच्या रूपाने मला श्री. पांडुरंगाचे दर्शन झाले–गिरीश महाजन जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन विभाग मंत्री,महाराष्ट्र राज्य
मंत्री गिरीश महाजन साहेब हे वारकऱ्यांना करीत असलेले मार्गदर्शन व त्यांच्यातील विठ्ठल भक्तीमुळे वारकऱ्यांचे श्री. विठ्ठलाचे दर्शन सुखकर झाले, त्यांनी केलेली ही मदत आम्ही सर्व वारकऱ्यांसाठी निश्चितच मोलाची ठरले आहे.गिरीश महाजन यांचे हे रूप पाहून ते मंत्री आहेत असे आम्हाला जाणवलेच नाही,आमच्यातीलच वारकरी म्हणून आम्ही त्यांना पाहत होतो,त्यांच्या या सेवेकरी रूपाने आम्ही वारकरी भारावलो आहोत – सुबोध ताटे,दहिवली ता.माढा जिल्हा सोलापूर

