महाराष्ट्र वकील संरक्षण कायद्यास मंजुरी द्या – आमदार समाधान आवताडे
आमदार समाधान आवताडे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वकील संरक्षण कायद्याची मागणी
मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७/०७/२०२५ – महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनात उपस्थित असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्यातील वकील बांधवांच्या विविध समस्या मांडत महाराष्ट्र वकील संरक्षण कायद्यास मंजुरी देण्याची मागणी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

महाराष्ट्रात सुमारे दोन लाख वकील बांधव व भगिनी बार असोसिएशन कौन्सिलच्या माध्यमातून कार्यरत आहेत. पक्षकार व समाजकंटकांकडून त्यांना सातत्याने मारहाण,जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात.तसेच त्यांच्याकडून खंडणीची मागणी केली जाते.या मागण्या पूर्ण न झाल्यास त्यांच्यावर सातत्याने जीवघेणे हल्ले होत असतात.अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना आळा घालण्याची गरज आहे.
देशातील अनेक राज्यांमध्ये वकील संरक्षण कायदा पारित करण्यात आला असून या कायद्याच्या माध्यमातून वकिलांना संरक्षण देण्यात आले आहे.त्याच पद्धतीने महाराष्ट्र राज्य व गोवा राज्यात वकील संरक्षण कायदा मंजूर करण्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन सादर केले.

