कोल्हापूर जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणूक: आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे निर्देश
कोल्हापूरमध्ये निवडणूक आचारसंहिता लागू : पहिल्या 24,48 व 72 तासांचा अहवाल सादर करण्याचे आदेश
कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सर्व विभागांना काटेकोर अंमलबजावणीचे निर्देश दिले आहेत.
Kolhapur election News कोल्हापूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.14 : कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर जिल्ह्यात तातडीने आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या सर्व निर्देशांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय विभाग प्रमुखांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली.

या बैठकीत आचारसंहितेचे तंतोतंत पालन करण्यावर भर देत पहिल्या २४, ४८ व ७२ तासांतील कार्यवाहीचे अहवाल सादर करण्याचे स्पष्ट आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पडावी, यासाठी प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावर प्रत्येकी तीन स्थिर तपासणी पथके तात्काळ कार्यान्वित करण्याचे निर्देश देण्यात आले.नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निराकरण करण्यासाठी स्वतंत्र आचारसंहिता कक्ष व तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
उमेदवारांच्या सोयीसाठी ‘एक खिडकी’ (Single Window System) पद्धतीद्वारे विविध परवाने एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणन व पेड न्यूज नियंत्रणासाठी जिल्हा माहिती कार्यालयात स्वतंत्र माध्यम कक्ष स्थापन करण्यात आल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
आचारसंहितेच्या कालावधीत मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या कोणत्याही नवीन शासकीय घोषणा करण्यास मनाई करण्यात आली आहे.सार्वजनिक ठिकाणी लावलेले जाहिरात फलक झाकणे, प्रचार साहित्य काढून टाकणे व नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले. विशेष म्हणजे नागरी भागात आचारसंहिता लागू नसली तरी तेथेही नवीन घोषणा करता येणार नाहीत,असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोणत्याही प्रकारच्या राजकीय प्रचारात सहभागी होऊ नये, असेही बजावण्यात आले आहे.

निवडणूक व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले की, मतदान केंद्रांवरील किमान आवश्यक सुविधा तपासून दोन दिवसांत अहवाल सादर करावा. नामनिर्देशन प्रक्रिया शिस्तबद्ध राबविणे, ईव्हीएमची प्राथमिक चाचणी तसेच मतदान यंत्रांच्या वाहतुकीबाबत राजकीय पक्षांना पूर्वकल्पना देऊन अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
या बैठकीला उपजिल्हाधिकारी संपत खिलारी,निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी तसेच जिल्ह्यातील सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व नोडल अधिकारी उपस्थित होते.






