या निवडणुकीत जनतेच्या बळावर विरोधातील उमेदवारांना अस्मान दाखवणार – स्वाभिमानी शेतकरी संघटना नेते राजू शेट्टी

या निवडणुकीत जनतेच्या बळावर विरोधातील उमेदवारांना अस्मान दाखवणार – स्वाभिमानी शेतकरी संघटना नेते राजू शेट्टी

उदगाव / ज्ञानप्रवाह न्यूज – माझ्या विरोधात साखर कारखानदार बहुसंख्य उमेदवार देऊन षडयंत्र करत आहेत. माझा उमेदवारी अर्ज येत्या 15 एप्रिलला दाखल करणार असून या निवडणुकीत जनतेच्या बळावर विरोधातील उमेदवारांना अस्मान दाखवणार असल्याचे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी उदगाव येथे कल्पवृक्ष गार्डन येथे संकल्प मेळाव्यात बोलताना केले.

महाविकास आघाडीच्या चुकीच्या धोरणामुळे भूमिअधिग्रहण कायद्यात बदल करून शेतकर्यांना हजारो कोटी नुकसानीत घातले असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

यावेळी बोलताना माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की, माझा उमेदवारी अर्ज येत्या 15 एप्रिलला बैलगाडीतून जाऊन भरणार आहे. शिवसेनेने पक्षात येण्याची अट घातली होती. गेली ३० वर्षे मला जनतेने तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले आहे असे असताना मी गद्दारी करून शिवसेनेत कसा प्रवेश करू. लोकसभा निवडणुकीत आमच्या विरुद्ध कारखानदार अशीच लढत होणार आहे. साखर कारखानदारांना माझ्या आंदोलनामुळे ६०० कोटी रूपये शेतकर्यांना जादा द्यावे लागले. त्याचा राग साखर कारखानदार लोकसभेच्या निवडणुकीत काढत आहेत. सत्यजीत पाटलांची उमेदवारी हे त्यांचेच षडयंत्र आहे.शेतकरी जोपर्यंत माझ्या पाठीशी आहेत,तोपर्यंत मला कशाचीच भिती नाही. प्रस्थापितांना जनता धडा शिकवून क्रांती घडेल, शक्तिपीठ महामार्गातून शेतकर्यांची २७ हजार हेक्टर जमीन संपादीत करून त्यांना देशोधडीला सरकार लावत असेल तर मी हे सहन करणार नाही.सत्यजीत पाटील व धैर्यशील माने हे साखर कारखानदारांचे हस्तक आहेत. त्यांना निवडणुकीत शेतकरी धडा शिकवतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रा. जालधंर पाटील म्हणाले,सत्यजीत पाटील व धैर्यशील माने हे साखर कारखानदारांचे प्यादे आहेत.एकनिष्ठ सत्यजीत पाटील शिवसेना फुटीवेळी गोव्यात बॅग भरून का गेले होते. त्यांच्या हातात झेंडा शिवसेनाचा व दांडा मात्र कॉंग्रेसचा असल्याची टीका त्यांनी केली.

यावेळी लोकांनी २१ लाख ८० हजार रूपये लोकवर्गणी गोळा करून राजू शेट्टी यांना दिली.यामध्ये नांदणी गावाने ११ लाख रूपये दिले.याप्रसंगी सावकर मादनाईक,वैभव कांबळे,पोपट मोरे,विठ्ठल मोरे,सागर संभूशेटे, शैलेश आडके,जयकुमार कोले, शमशुद्दीन संदे,संदीप राजोबा,श्रीवर्धन पाटील,राम शिंदे, अण्णासो चौगुले आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *