वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन ॲक्शन मोडवर; अतिक्रमणधारकांना इशारा -मुख्याधिकारी महेश रोकडे

आषाढी यात्रा कालावधीत पंढरपूर शहरात अतिक्रमण हटाव मोहिम

रस्ते,फुटपाथ व सार्वजनिक जागा अतिक्रमणमुक्तीसाठी पंढरपूर नगरपरिषद ॲक्शन मोडवर

पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज: पंढरपूर शहरामध्ये आषाढी यात्रा कालावधीत लाखो वारकरी, भाविक व पर्यटक आगमन करीत असतात. वारकरी व नागरिकांना सुरक्षित, सुलभ व अडथळामुक्त मार्ग उपलब्ध व्हावा. तसेच वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी. यासाठी जिल्हा प्रशासन सोलापूर व पंढरपूर नगर परिषदेमार्फत शहरातील सर्व प्रमुख रस्ते, फुटपाथ, चौक, सार्वजनिक जागा व यात्रा मार्ग अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले आहे.

त्याअनुषंगाने शहरातील सर्व फेरीवाले,हातगाडीधारक, टपरीधारक,तात्पुरते दुकानदार, व्यावसायिक तसेच नागरिकांना सूचित करण्यात येते की, सार्वजनिक रस्ता,फुटपाथ,नाला, गटार,चौक,सार्वजनिक मोकळी जागा अथवा नगरपरिषदेच्या मालकीच्या जागेवर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण, अनधिकृत मालसाठा, जाहिरात फलक, बांधकाम साहित्य,शेड,टपरी, शौचालय किंवा बाथरूम किंवा इतर साहित्य ठेवू नये.

ज्या व्यक्तींनी अशा प्रकारचे अतिक्रमण केले असेल त्यांनी ते तात्काळ स्वतःहून काढून घ्यावे. अन्यथा महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगर अधिनियम, 1965 तसेच महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, 1966 मधील तरतुदीनुसार कोणतीही पुढील सूचना न देता अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात येईल.

कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेल्या साहित्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील तसेच अतिक्रमण हटविण्यासाठी झालेला खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात येईल.या कमी झालेला खर्च संबंधितांच्या घरपट्टीमध्ये दंडासह नावे करण्याची कारवाई करण्यात येईल.

 

आषाढी यात्रेच्या पार्श्वभुमीवर वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी अतिक्रमणमुक्त पंढरपूर आणि स्वच्छ पंढरपूर करण्यात येत आहे. शहरातील नागरिक, व्यापारी, फेरीवाले व रहिवाशांनी प्रशासनास सहकार्य करून पंढरपूर शहर स्वच्छ, सुरक्षित व अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी सहकार्य करावे -महेश रोकडे मुख्याधिकारी, पंढरपूर नगरपरिषद

आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर नगरपरिषदेने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे. रस्ते, फुटपाथ व सार्वजनिक जागा अतिक्रमणमुक्त करून वारकरी, भाविक आणि नागरिकांसाठी सुरक्षित व सुलभ वाहतूक व्यवस्था सुनिश्चित करण्याचे प्रशासनाचे उद्दिष्ट आहे.

आषाढी यात्रेसाठी पंढरपूर सज्ज होत असून लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी नगरपरिषद आणि जिल्हा प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे. रस्ते, फुटपाथ आणि सार्वजनिक जागा मोकळ्या करून अडथळामुक्त यात्रा मार्ग तयार करण्यावर भर देण्यात आला आहे.

Leave a Reply

Back To Top