कल्याण लोकसभा मतदारसंघातील विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांना गती द्या-खासदार डॉ श्रीकांत शिंदे
कल्याण लोकसभा मतदारसंघातील विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांना गती द्या-खासदार डॉ श्रीकांत शिंदे
कल्याण /ज्ञान प्रवाह न्यूज-कल्याण लोकसभा मतदार संघातील विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांबाबत एमएमआरडीए मुख्यालयात एक महत्वाची बैठक पार पडली.यावेळी बैठकीत मतदारसंघात सुरू असलेल्या वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाच्या प्रकल्पांचा आढावा घेतला.

यावेळी खासदार डॉ श्रीकांत शिंदे, एमएमआरडीए आयुक्त डॉ.संजय मुखर्जी, एमएसआरडीसी व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड, एमएमआरडीए अतिरिक्त आयुक्त अश्विन मुदगल यांची मुख्य उपस्थिती होती.
यावेळी बैठकीत पुढील महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली- अंबरनाथ येथे रेल्वे स्थानक परिसरात सुमारे ८० कोटी रुपयांच्या निधीतून सॅटिस उभारण्यात येत आहे.या प्रकल्पाच्या उभारणीसाठी लागणाऱ्या जागेबाबत आढवा घेतला.या प्रकल्पाच्या उभारणीसाठी लागणाऱ्या जागेबाबत योग्य तो निर्णय घेऊन त्याच्या उभारणीला गती देण्याच्या सूचना खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी केल्या.

- डोंबिवली आणि टिटवाळा या दोन्ही शहरांतील अंतर कमी करण्यासाठी कल्याण रिंग रोड हा मार्ग महत्वाचा ठरणार आहे. या प्रकल्पाची आठ टप्प्यांमध्ये उभारणी करण्यात येत आहे. यातील टप्पा – ४ (दुर्गाडी ब्रिज ते गांधारे ब्रिज), टप्पा – ५ (गांधारी ब्रिज ते मांडा जंक्शन), टप्पा – ६ (मांडा जंक्शन ते टिटवाळा जंक्शन), टप्पा – ७ (टिटवाळा जंक्शन ते एसएच ३५-४० रोड जंक्शन) या टप्प्यांचे काम जवळपास पूर्ण झाले असून यातील बहुतांश रस्ता सध्या वापरला जातो आहे. टप्पा – ३ (मोठा गाव ते गोविंदवाडी बायपास रोड) या रस्त्याचे काम प्रगतीपथावर असून येत्या काही महिन्यात याचे काम लवकरच पूर्ण होणार आहे.
- यातील टप्पा – १ (हेदुटणे ते शिळ रोड) या मार्गाच्या उभारणीसाठी लागणाऱ्या जागेचे भूसंपादन सुरु आहे तर टप्पा – २ (शीळ रोड ते मोठागाव ब्रीज) या नियोजित मार्गाचे नव्याने आरेखन करण्यात आले असून, यानुसार काम जलदगतीने पूर्ण करावे अशा सूचना खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी दिल्या.
- वाहतुकीचा ताण कमी व्हावा आणि नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी शिळफाटा – रांजनोली येथे द्विस्तरिय (डबल डेकर) रस्ता उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.या रस्त्याची उभारणी साठी जलदगतीने निविदा प्रक्रिया राबविण्यात यावी,अशा स्पष्ट सूचना खा.श्रीकांत शिंदे यांनी दिल्या.
- ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो ५ प्रकल्प आता दुर्गाडी नाका ते कल्याणमार्गे उल्हासनगरच्या कल्याण – बदलापूर मार्गाने बदलापूर आणि अंबरनाथ शहराच्या मध्यभागी उभे राहत असलेल्या चिखलोली रेल्वे स्थानकापर्यंत नेण्यात येणार आहे.यामुळे अंबरनाथ, उल्हासनगर व आजूबाजूच्या परिसरातील रहिवाशांना मुंबई,नवी मुंबई आणि ठाणे गाठणे सोपे होणार आहे.याबाबत एमएमआरडीएकडून आराखडा तयार करण्यात येत असून याबाबत आज आढावा घेऊन याचे काम वेगाने करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.
- मेट्रो १२ चे कामदेखील सध्या जलदगतीने सुरू आहे.यामध्ये मार्गात पिलर उभारणीचे, तसेच स्थानक उभारणीचे काम सुरू आहे. याला अधिक वेग देण्याच्या सूचना करण्यात आल्या.
- यावेळी मतदारसंघात उभारण्यात येणाऱ्या एक्सेस कंट्रोल मार्गाच्या उभारणीचा आढावा घेतला. या मार्गाच्या आरेखनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
- अंबरनाथ – बदलापुर – उल्हासनगर संयुक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या उभारणीचा आज आढावा घेण्यात आला.या प्रकल्पाच्या कामाला गती मिळत असून याचे काम जलदगतीने करावे यासाठी तिन्ही पालिका प्रशासनाने समन्वय साधावा.
- डोंबिवली येथे देखील सॅटिस प्रकल्पाची उभारणी करण्यात यावी.यासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.यामुळे स्थानक परिसरातील कोंडी सुटण्यास मदत होणार आहे
- यू टाईप रस्ता,इतर महत्वाच्या रस्त्यांच्या निविदा प्रक्रिया वेगाने राबवण्याचा सूचना यावेळी खा.श्रीकांत शिंदे यांनी केल्या.

याप्रसंगी कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे,कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर,ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव,कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त अभिनव गोयल,विविध महापालिका, प्रशासकीय संस्था यांचे अधिकारी, अभियंते तसेच शिवसेनेचे पदाधिकारी राजेंद्र चौधरी,अरुण आशान, राजेश कदम,रवी पाटील,रमाकांत देवळेकर, निलेश शिंदे,रमाकांत मढवी,बाबाजी पाटील, महेश गायकवाड,पप्पू पिंगळे,मिलिंद पाटील, राजन मराठे,नितीन पाटील,सागर जेधे, कुणाल भोईर आदी उपस्थित होते.

