साखर कारखान्यांवरती प्रशासक नेमावा – स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष सचिन पाटील
साखर कारखान्यांवरती प्रशासक नेमावा – स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष सचिन पाटील Appoint an administrator for sugar factories – Swabhimani Shetkari Sanghatana taluka president Sachin Patil

पंढरपूर : सोलापूर जिल्हयातील सहकारी साखर कारखान्यांमध्ये कित्येक वर्षांपासून अनागोंदी कारभार सुरू आहे.राज्य बँकेकडून साखर कारखान्यांचे एक्सपांशन करण्यासाठी कर्ज घेण्यात आले आहे .एक्सपांशनच्या नावाखाली साखर कारखान्यांवरती कर्जाचा डोंगर उभा राहिला असल्याने सहकारी साखर कारखान्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी केली आहे.
विठ्ठल,भीमा,दामाजी व सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्यांकडील शेतकऱ्यांची थकित एफआरपी,कामगारांचे थकित पगार,ऊस वाहतुकदारांची देणी मागण्यांसाठी पंढरपूर पत्रकार भवन पत्रकार परिषद आयोजीत करण्यात आली होती त्यावेळी सचिन पाटील बोलत होते .
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल,जिल्हा संघटक शहाजहान शेख , सचिन आटकळे, विश्रांतीताई भुसनर , समाधान घोगरे ,अमर इंगळे, विक्रम भोसले ,पार्थ सुरवसे , पंढरपूर माढा विधानसभा अध्यक्ष नानासाहेब चव्हाण , जिल्हा कार्यकारणी सदस्य बाहुबली सावळे आणि कांतीलाल नाईकनवरे , नामदेव कोरके, सचिन बागल आदी उपस्थित होते .
साखर कारखान्यांवरती प्रशासक नेमावा
विठ्ठल ,भीमा,दामाजी व सहकार शिरोमणी वसंतराव काळे कारखान्यांवरती कर्जाचा डोंगर आहे . कर्जाच्या खाईत साखर कारखाने घालून कुणाच्या तरी घशात साखर कारखाने घालण्याचा डाव चेअरमन व संचालक मंडळाचा आहे .साखर कारखान्याचे पूर्ण संचालक मंडळ बरखास्त करुन सरकारने प्रशासक नेमावा . यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व जेष्ठ नेते शरद पवार यांना भेटणार असल्याचेही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
यावर्षीचा गाळप हंगाम सुरू होणार आहे.विठ्ठल, भीमा,दामाजी व सहकार शिरोमणी वसंतराव काळे कारखान्यांकडे शेतकरी , वाहतुकदार व कामगारांची देणी थकित आहेत . कारखाना प्रशासनाकडे वेळोवेळी शेतकरी,शेतकरी संघटनांचे पदाधिकारी हेलपाटे मारत आहेत . चेअरमन यांचे मोबाईल नॉट रिचेबल असून त्यांच्याकडून पळवाटा शोधण्याचे काम सुरू आहे. यंदाच्या हंगामात तर ऊस कारखाने सुरू करणार का ? याबाबत चेअरमन व संचालक मंडळांनी करावा . गळीत हंगाम सुरू करता येत नसेल तर राजीनामे देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली आहे .