भीमाशंकर तीर्थक्षेत्राचा कायापालट कुंभमेळ्यापूर्वी ९० टक्के विकासकामे पूर्ण होणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भीमाशंकर तीर्थक्षेत्राचा कायापालट कुंभमेळ्यापूर्वी ९० टक्के विकासकामे पूर्ण होणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भीमाशंकर मंदिर परिसर विकासाला वेग; भाविकांची संख्या 5 ते 10 पट वाढणार, मुख्यमंत्र्यांचा विश्वास

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चावीच्या दगडाची विधीवत पुजा आणि ब्रह्मध्वजारोहण

पुणे | जिमाका,दि.१३ जून : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भीमाशंकर येथील मुख्य मंदिरासमोर नव्याने बांधण्यात आलेल्या सभामंडपाच्या चावीच्या दगडाची विधिवत पूजा तसेच ब्रह्मध्वजारोहण करण्यात आले. यानंतर त्यांनी श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे सुरू असलेल्या मंदिर परिसर विकास आणि हेरिटेज वाडी प्रकल्पाची केली.यावेळी त्यांनी कामाची गती गुणवत्तेबाबत समाधान व्यक्त केले. पुढील वर्षी कुंभमेळा सुरू होण्यापूर्वी या प्रकल्पातील सुमारे ९० टक्के काम पूर्ण होईल,असा विश्वास श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.

यावेळी आमदार दिलीप वळसे- पाटील,बाबाजी काळे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी,मंदिराचे विश्वस्त आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

कमी कालावधीत उत्कृष्ट दर्जाचे काम केल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे कौतुक करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,भीमाशंकर ज्योतिर्लिंगाला देशभरात मोठी मान्यता असून या तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू करण्यात आलेल्या प्रकल्पात मूळ मंदिराचा सभामंडप,त्याचा जीर्णोद्धार आणि परिसर विकासाची कामे अतिशय वेगाने सुरू आहेत.मंदिर परिसर विकासाच्या माध्यमातून भीमाशंकरचे संपूर्ण रूप पालटणार आहे.यापूर्वी मंजूर करण्यात आलेल्या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या सहकार्याचा त्यांनी विशेष उल्लेख केला.

हेरिटेज वाडी प्रकल्पाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की,सुमारे दीडशे घरे नव्या ठिकाणी स्थलांतरित होत असून या नागरिकांसाठी शेजारीच आधुनिक सुविधांनी युक्त नवीन गाव उभारण्यात येत आहे.हे गाव केवळ पुनर्वसनापुरते मर्यादित राहणार नसून तेथील अर्थव्यवस्थेलाही नवी दिशा मिळेल,असे त्यांनी सांगितले.

परिसरातील वाहतूक व्यवस्थे बाबतही महत्त्वपूर्ण नियोजन करण्यात आले आहे. जाण्यासाठी आणि येण्यासाठी स्वतंत्र रस्ते तयार केले जात असून त्यामुळे वाहतूक कोंडी होणार नाही.ज्येष्ठ नागरिकांच्या सुविधेसाठी इलेक्ट्रिक वाहनांची व्यवस्था करण्यात येणार आहे. दुकाने,बसस्थानक आणि इतर सार्वजनिक सुविधा सुव्यवस्थित पद्धतीने विकसित केल्या जात असून भाविक आणि स्थानिक व्यावसायिक या दोघांच्याही हिताचा विचार करण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमुद केले.

या सर्व विकासकामांमुळे भविष्यात भीमाशंकर येथे येणाऱ्या भाविकांची संख्या पाच ते दहा पट वाढेल,असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी कामाबाबत समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

Back To Top