मिरज दंगल : शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीच्या नेत्यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा
हायलाइट्स:
- राजकीय नेत्यांसह ११० जणांवर दाखल झाले होते गुन्हे
- न्यायालयाकडून दंगलीचा खटला रद्द
- सर्वपक्षीय नेत्यांना मोठा दिलासा
मिरज दंगलीत पोलीस आणि नागरिकांवर दगडफेक करुन सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल ११० जणांवर गुन्हे दाखल झाले होते. याबाबत सांगली जिल्हा न्यायालयात खटला सुरू होता. यापूर्वी माजी मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुरेश खाडे यांच्यासह माजी नगरसेवक मकरंद देशपांडे, नगरसेवक पांडुरंग कोरे यांची २०१७ मध्ये या खटल्यातून मुक्तता करण्यात आली होती.
दंगलीत सहभागी असल्याचा गुन्हा दाखल झालेल्या इतरांचीही खटल्यातून मुक्तता करावी, अशी विनंती राज्य सरकारने न्यायालयाला केली होती. सत्र न्यायालयाने दाखल खटले मागे घेण्यास परवानगी देत १०६ जणांवरील आरोप रद्द केले.
दरम्यान, आरोपींनी केलेले विशिष्ट कृत्य व त्यांचा सहभाग स्पष्ट होत नाही. केवळ साक्षीच्या आधारावर आरोपींना दोषी ठरवता येणार नाही. रेकॉर्डवरील कागदपत्रे व पुरावे पुरेसे नाहीत. आरोपींवर खटला चालवल्याने सार्वजनिक शांततेस बाधा येऊ शकते, यामुळे खटला मागे घेऊन आरोपींना मुक्त करण्याची राज्य सरकारची विनंती मान्य करण्यात येत असल्याचं न्यायालयानं निकालात म्हटलं आहे. या निर्णयामुळे शिवसेनेचे बजरंग पाटील, सुनिता मोरे, विकास सूर्यवंशी, राष्ट्रवादीचे मैनुद्दीन बागवान, अभिजीत हारगे, आदी राजकीय नेत्यांना दिलासा मिळाला आहे.