सोलापूर आशाराणी भोसले आत्महत्या प्रकरण पाठपुरावा
आशाराणी भोसले आत्महत्या प्रकरण, सदरील घटनेकडे दुर्लक्ष करणार्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करा : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
सोलापूर शहर पोलिसांना डॉ.नीलम गोऱ्हे यांचे निर्देश
सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,०५/०६/२०२५ – सोलापूर जिल्ह्या तील चिंचोली एमआयडीसी ता.मोहोळ येथे राहणाऱ्या २६ वर्षीय आशाराणी भोसले यांनी दि.०३ जून २०२५ रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.त्यादरम्यान एका अल्पवयीन मुलीला तिच्या रंगावरून वडिलांनी सातत्याने बोलल्यामुळे तिने आत्महत्या केल्याची घटना घडली.तसेच संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या आणि उपसभापती डॉ.नीलम ताई गोऱ्हे या सोलापूर जिल्ह्याच्या दौर्यावर असताना सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम,सोलापूर महानगर पालिका आयुक्त सचिन ओंबासे,जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील,सोलापूर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रवी पवार या सर्व अधिकाऱ्यांसोबत नीलम गोऱ्हे यांनी बैठक घेतली.

या बैठकीनंतर नीलम गोऱ्हे बोलताना म्हणाल्या की, आशाराणी भोसले यांच्यावर होणार्या अत्याचाराबाबत त्यांनी सुरुवातीच्या काळात पोलिसांकडे तक्रार केली.त्यावेळी पोलिसांनी तडजोड केली. त्यादरम्यान त्या महिलेचा छळ झाला आणि तिला आत्महत्येचे पाऊल उचलावे लागले, त्यामुळे आशाराणीच्या छळाकडे दुर्लक्ष करणाऱ्या त्या पोलिसांची चौकशी करा,असे निर्देश ग्रामीण पोलिसांना दिल्याचे त्यांनी सांगितले.
त्या पुढे म्हणाल्या की,सोलापूर शहर आणि ग्रामीण भागातील तरुणी,महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी भरोसा सेल, दक्षता समितीच्या माध्यमांतून वेळोवेळी महिलांशी संवाद साधण्यात यावा जेणेकरून अशा अन्याय अत्याचाराच्या घटना सुरुवातीच्या कालावधीत समजण्यास मदत होईल.त्यातून पीडित तरुणी किंवा महिलेला न्याय देता येईल,असे निर्देश पोलिस अधिकार्यांना दिले आहे.
राज्यभरातील तरुणी आणि महिलांवरील अन्याय अत्याचार रोखण्यासाठी सुरुवातीला पिडीतेने आपल्या आसपासच्या व्यक्तीला आपल्यासोबत घडणार्या घटनेबाबत सांगितले पाहिजे तरच अशा घटना रोखण्यात आपल्याला यश येईल आणि महिलांच्या प्रश्नावर समाजातील प्रत्येक घटकांने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या प्रशासनाच्या तयारीचा डॉ नीलम गोऱ्हे यांनी आढावा घेतला.त्याबाबत बोलताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या की,पंढरपूर मुख्य बस स्थानकात प्रचंड अस्वच्छता आणि कचऱ्याचे साम्राज्य असल्याची माहीती समोर आली आहे.बस स्थानक आणि आजूबाजूच्या परिसरात मोकाट जनावरांच्या वावराबाबत नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेऊन उपायोजना कराव्यात.तसेच बस स्थानक परिसरात चोरट्यांचे प्रमाण जास्त असून महिलांची छेडछाड केली जात असल्याच्या अनेक तक्रारी आहेत त्याबाबत एस.टी विभागाचे नियंत्रक अमोल गोंजारी यांना निर्देश देण्यात आले.
नदी घाटातील पाणी वाळवंटातील खड्ड्यांमध्ये साचून होणाऱ्या संभाव्य अपघातांची शक्यता लक्षात घेऊन सदरचे खड्डे क्षेत्र प्रतिबंधित करून त्या ठिकाणी धोक्याचे फलक तातडीने लावण्याबाबत संबंधीत अधिकार्यांना लवकर लवकर काम करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या.
पंढरपूरला रेल्वे क्षेत्रातील पुलाखालील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेले असून त्याबाबत लक्ष देणे गरजेचे आहे अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकते याबाबत डॉ.नीलम ताई गोऱ्हे यांनी लक्ष घालावे अशी पंढरपूर वासियांची अपेक्षा आहे.

