शिवसेना वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला डॉ.नीलम गोऱ्हे यांचे कुलदेवतेचे दर्शन; जनकल्याणाच्या कामांना गती देण्याची प्रार्थना

शिवसेना वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला घेतले कुलदेवतेचे दर्शन; शेतकरी, महिला आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर अधिक प्रभावीपणे काम करण्याची व्यक्त केली कटिबद्धता

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार अधिक प्रभावीपणे पुढे नेण्याचा निर्धार

चांदवडच्या रेणुका मातेच्या चरणी डॉ. नीलम गोऱ्हे यांचा जनसेवेचा संकल्प; शेतकरी व महिलांच्या सक्षमीकरणासाठी कटिबद्धता

नाशिक | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१८ जून २०२६ : नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील श्री रेणुका देवी या शिवसेना नेत्या तथा विधान परिषदेच्या सदस्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या गोऱ्हे परिवाराच्या कुलदेवता आहेत.नुकतीच त्यांची पाचव्यांदा विधान परिषदेवर नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी आज चांदवड येथे जाऊन श्री रेणुका मातेचे दर्शन घेतले.

यावेळी डॉ.नीलम गोऱ्हे यांनी देवीची आरती करून प्रसाद व नैवेद्य अर्पण केला. तसेच महावस्त्र, चांदीचा दीप आणि हळद-कुंकवाचा करंडा देवीला अर्पण करण्यात आला. मंदिराचे पुजारी,शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच भाविक यावेळी उपस्थित होते.

उद्या होणाऱ्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार अधिक प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचविण्याची शक्ती मिळावी, तसेच शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हाती घेतलेली जनकल्याणाची कामे यशस्वीपणे पूर्ण होण्यासाठी आशीर्वाद मिळावा, अशी प्रार्थना आपण श्री रेणुका मातेच्या चरणी केल्याचे डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, यंदा उशिरा सुरू झालेला पावसाळा,एल- निनोचा संभाव्य परिणाम आणि नैसर्गिक आपत्तींची शक्यता लक्षात घेता शेतकरी व सर्वसामान्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकरी, महिला,विद्यार्थी,बेरोजगार युवक तसेच समाजातील सर्व घटकांच्या कल्याणासाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

आगामी अधिवेशनात जनतेच्या प्रश्नांवर ठोस भूमिका मांडण्यासोबतच शेतकरी महिलांच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांवर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.महिलांच्या नेतृत्व विकासासाठी आणि त्यांच्या राजकीय सहभागात वाढ करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविले जात असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.तसेच नमो शक्ती वंदन विधेयक एकदा मंजूर झाले नसले तरी महिलांच्या राजकीय सहभागासाठीचे प्रयत्न थांबलेले नाहीत, असे त्या म्हणाल्या.

ये ना समझो के हम सदा के हारे हैं, राख के नीचे जल रहे अभी भी अंगारे हैं, या ओळींचा उल्लेख करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली महिलांच्या राजकीय सक्षमीकरणासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. महिलांच्या नेतृत्व विकासाला चालना देण्यासाठी आणि महिलांच्या नेतृत्वातून विकास साधण्यासाठी आपण पुढेही कटिबद्ध राहणार असल्याचे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Back To Top