कारखाना सोडून कुठलीही निवडणुक लढविणार नाही असे सांगत सत्ता मिळविणाऱ्याला केवळ 2 महिन्यात आमदारकीचे स्वप्न – भगिरथ भालके

आमदारकीचे स्वप्न पाहणाऱ्यांना चारीमुंडी चित करु – भगिरथ भालके

पंढरपूर / प्रतिनिधी, दि.03 – श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत कारखानदारी चालविणाऱ्यांनी आमदारकीचे स्वप्न बघु नये. मी भविष्यात कारखाना सोडून कुठलीही निवडणुक लढविणार नाही असे सांगून सत्ता मिळविणाऱ्याला केवळ दोनच महिन्यात आमदारकीचे स्वप्न पडू लागली आहेत. जनतेच्या आर्शिवादाने त्यांना चारी मुंडया चित करु असा विश्वास भगिरथ भालके यांनी व्यक्त केला.

पंढरपूर तालुक्यातील उपरी येथे सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी चेअरमन कल्याणराव काळे, विठ्ठल साखर कारखान्याचे माजी संचालक युवराज पाटील,ॲड गणेश पाटील, समाधान काळे, दशरथ खळगे, राजाराम बाबर, राजाराम जगदाळे, शहाजी साळूंखे, सुरेश देठे, नागेश फाटे, सुधाकर कवडे, महादेव देठे, आण्णा शिंदे आदी उपस्थित होते.

पंढरपूरच्या राजकारणात अर्थकारणातून सत्ता मिळविण्याचा नवा पायंडा पाडण्याचा काही जणांकडून प्रयत्न होत आहे. विठ्ठलच्या निवडणुकीनंतर शिल्लक राहिलेली साखर विक्री करुनच शेतकऱ्यांचे पैसे देणाऱ्यांनी आमच्या बदनामीचा कांगावा केला. कारखाना सुरु करण्यासाठी पुर्वीची आम्ही करुन ठेवलेली सोय वापरुन श्रेय लाटण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला. विठ्ठल परिवारातील कल्याणराव काळे, युवराज पाटील, गणेश पाटील यांच्यामध्ये असणारे मतभेद मिटले असून भविष्यात सर्वसामान्य जनतेसाठी एकत्रित येवून सर्व निवडणुका एकदिलाने लढविल्या जातील असा विश्वास भगिरथ भालके यांनी व्यक्त केला.

युवराज पाटील यांनी आपल्या भाषणात विठ्ठलच्या निवडणुकीत आमच्यामध्ये राजकीय मतभेद होते मात्र मनभेद नव्हते ते आता आम्ही बाजुला सारुन सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याच्या निवडणुकीत कल्याण काळे यांचे सोबत राहणार आहोत. कारखानदारीत चांगल्या प्रवृत्तीची माणसे यावीत म्हणून आम्ही कल्याणराव काळे यांना साथ देण्याचे ठरविले आहे. कै.औदुंबर आण्णांची शिकवण असल्यामुळे गद्दारी आम्ही केली नाही व करणार नाही.आम्ही कल्याणराव काळे यांच्या बरोबर येत असताना कोणतेही आश्वासन, पद, शब्द याची अपेक्षा न करता खुल्या मनाने साथ देणार आहोत. सभासदांसाठी कारखाना चांगला चालला पाहिजे. आम्ही कै.वसंत काळे, कै.भारत भालके यांच्या विचाराने चालणारे वारस आहोत. आम्ही विश्वासाला कदापी तडा जावू देणार नाही तरी या निवडणुकीत सभासदांनी जागृत राहून कल्याणराव काळे यांना साथ द्यावी असे आवाहन युवराज पाटील यांनी केले.

यावेळी गणेश पाटील म्हणाले की, विठ्ठलच्या निवडणुकीत झालेल्या चुकांची पुनरावृत्ती होवून चुकीच्या प्रवृत्तीची माणसे तालुक्याच्या राजकारणात सक्रिय होवू नये यासाठी आम्ही एकत्रित आलो आहोत.भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्थांच्या निवडणुकांत अनेक कार्यकर्त्यांना पदाधिकारी म्हणून संधी मिळणार आहे. आगामी सहकार शिरोमणी निवडणुकीसाठी तालुक्यातून चांगल्या प्रकारे मतदान करुन ही एकी सभासदांनी दाखवून देणे गरजेचे आहे.राजकीय परिस्थिती बदलत चालली आहे .ही निवडणुक सर्वसामान्यांच्या प्रपंचाशी निगडीत आहे.20 वर्षे कारखाना चांगला चालला आहे.परंतू दोन वर्षात दुष्काळ परिस्थिती, आर्थिक अडचणी व मानव निर्मित अडचणी आल्यामुळे बीले देण्यास विलंब लागला आहे. तरीही कल्याणराव काळे यांनी अडचणीतून मार्ग काढीत कारखाना चालु ठेवला त्यामुळे सभासदांनी या निवडणुकीत त्यांच्या पाठीशी ताकदीने उभे राहिले पाहिजे. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आपआपसातील मतभेद मिटविले पाहिजेत.यासाठी सभासदांनी जागृत राहून सहकार शिरोमणी साखर कारखान्याच्या निवडणुकीत कल्याणराव काळे यांना मतदान करुन साथ द्यावी असे आवाहन पाटील यांनी केले.

यावेळी विठ्ठलचे संचालक समाधान काळे, शेतकरी संघटनेचे समाधान फाटे,भारत बागल, सुधाकर कवडे यांची समायोचित भाषणे झाली.

उपरी येथील सभासदांनी गुलाबी रंगाचे फेटे बांधून सभेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. सभेसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने वाहतुक नियंत्रणासाठी पोलिसांनी हस्तक्षेप केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: