प्रत्येकाने अधिकाधिक निःस्वार्थ सेवा करून मातृभूमीचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करावा – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी Everyone should try to repay debt of mother land by doing more selfless service – Governor Bhagat Singh Koshyari
मुंबई, दि.१९ /०८/२०२१ :- भारतीय समाजात दान, पुण्य व सेवा कार्याला फार महत्त्व आहे. सेवा परमो धर्म: असे आपल्या देशात मानले जाते.या सेवाभावामुळे करोना काळात तसेच अतिवृष्टीनंतर उद्भवलेल्या परिस्थितीत शासकीय, अशासकीय संस्थांसह सामान्य नागरिकांनी विलक्षण कार्य केले. प्रत्येकाने अशीच अधिकाधिक निःस्वार्थ सेवा करून मातृभूमीचे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.
करोना काळात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ५० करोना योद्ध्यांचा राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. जय फाऊंडेशन व रुद्र प्रतिष्ठान यांच्यावतीने आयोजित या सत्कार सोहळ्याला आमदार संजय केळकर, माजी खासदार संजीव नाईक, महाराणा प्रताप महासंघाचे अध्यक्ष अमरसिंह ठाकूर तसेच जय फाऊंडेशनचे संस्थापक धनंजय सिंह सिसोदिया प्रामुख्याने उपस्थित होते.
राज्यपालांच्या हस्ते नवाझ मोदी सिंघानिया, शायना एनसी, डॉक्टर्स, पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, समाजसेवक यांच्यासह प्रभात ट्रस्टच्या सेवाकार्याचा गौरव करण्यात आला. प्रभात ट्रस्टच्यावतीने डॉ.प्रशांत थोरात यांनी हा सन्मान माजी खासदार संजीव गणेश नाईक,आमदार संजय केळकर व इतर मान्यवरांच्या उपस्थित स्वीकारला.