भगवान महावीरांच्या २६२३ व्या जन्मकल्याण सोहळ्यात विविध उपक्रमांचे आयोजन
तुषार गांधींच्या उपस्थित होणार विशेषांक प्रकाशन,विचार संगोष्ठी व पुरस्कार वितरण
सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज : वर्धमान विश्व प्रतिष्ठान आणि पंचरंग प्रबोधिनी रौप्य महोत्सव समितीच्या वतीने भगवान महावीर : जीवन व विचार शोध व बोध विशेषांकाचे प्रकाशन, ‘महावीर व महात्मा गांधी’ या विषयावर संगोष्ठी आणि ‘पुरस्कार वितरण’ अशा तीन उपक्रमांचे आयोजन सहा एप्रिल रोजी सोलापूरातील स्मृति मंदिरात सायंकाळी ६.३० वाजता महात्मा गांधी यांचे पणतु व लेखक तुषार गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आले आहे.या कार्यक्रमात वितरीत होणाऱ्या पुस्कारांची घोषणा करण्यात आली. प्राणीमित्र विलास शिवलाल सर्वोदय ट्रस्ट माढा आणि स्नेहालय (अहमदनगर) यांच्या संयुक्त विद्यमाने हे पुरस्कार देण्यात येणार आहेत.
यात डॉ.रावसाहेब पाटील यांना प्रा.ग.प्र. प्रधान पुरस्कार, अंधश्रध्दा निर्मूलन वार्तापत्राचे प्रकाशक व व्यवस्थापकीय संपादक राहुल थोरात यांना डॉ.नरेंद्र दाभोळकर प्रेरणा पुरस्कार,अजित फौंडेशनच्या सौ.विनया आणि महेश निंबाळकर यांना सौ.साधना आणि बाबा आमटे सेवावृती दाम्पत्य पुरस्कार,धन्यकुमार पटवा यांना स्व.वालुबाई शहा प्राणीमित्र पुरस्कार देऊन पुरस्कार विजेत्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
वरील पुरस्काराराचे स्वरुप रुपये अकरा हजार रोख,स्मृती चिन्ह,सन्मानपत्र व शाल- श्रीफल असे स्वरुप असल्याचे स्नेहालय अहमदनगर चे प्रमुख व पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ.गिरीश कुलकर्णी यांनी घोषित केले आहे.
याप्रसंगी पंचरंग प्रबोधिनी रौप्य महोत्सव समितीच्यावतीने डॉ.सरिता नलिनचंद्र कोठाडिया (सोलापूर),ॲड प्रिया प्रविणकुमार शहा मुंबई,श्रीमती सुजाता निरंजन शहा पुणे, स्वरुपा राजेंद्र पाटील (यड्रावकर) जयसिंगपूर आणि डॉ.स्वाती आनंद दोभाडा यांना वीर माता त्रिशला गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. सन्मानार्थ दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराचे स्वरुप मानपत्र, भेटवस्तू, शाल व श्रीफल असल्याचे निवड समितीचे सदस्य प्रा.नरेश बदनोरे यांनी जाहीर केले.
या समारंभास ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, अकलूज येथील सुप्रसिध्द स्त्रीरोग तज्ञ डॉ. सतिश जम्बुकुमार दोशी,जैन सहयोगचे अध्यक्ष मिलिंद फडे, चंदुकाका सराफ ॲंन्ड सन्स चे किशोरकुमार शहा, जोहडकार सुरेखा शहा आदि उपस्थित राहणार आहेत. सदरहू कार्यक्रम सर्वांना खुला आहे. नागरिकांनी बहुसंख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजन समितीच्या वतीने जनसंपर्क समितीचे प्रमुख संदेश गांधी व नंदकुमार कंगळे यांनी केले आहे.