आदिवासी व दुर्गम भागातील आरोग्य सुविधा बळकट करण्यास प्राधान्य – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर prakash abitkar
महाराष्ट्रातील आदिवासी व दुर्गम भागांमध्ये आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी विशेष आरोग्य शिबिरे, रिक्त पदे भरणे,स्वच्छता व आहार व्यवस्थेवर भर देण्याचे निर्देश आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.
Mumbai aarogya news : मुंबई,दि. ०८,प्रतिनिधी : महाराष्ट्रातील आदिवासी व दुर्गम भागांमधील नागरिकांना दर्जेदार आणि सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य सुविधांचे medical facilities बळकटीकरण करण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यावे,असे स्पष्ट निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर prakash abitkar यांनी दिले.

अमरावती,मेळघाट,अकोला,जळगाव, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर व नागपूर येथील विविध आरोग्य संस्थांना दिलेल्या भेटीदरम्यान आरोग्यमंत्र्यांनी केलेल्या सूचनांच्या अनुषंगाने मंत्रालयातील समिती सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली.
या बैठकीस आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.निपुण विनायक,आरोग्यसेवा आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे,आरोग्य सेवा संचालक डॉ.नितीन अंबाडेकर, सहसंचालक डॉ.सुनिता गोल्हाईत,डॉ. सरिता हजारे आदी उपस्थित होते तर संचालक डॉ.विजय कंदेवाड आणि आदिवासीबहुल भागातील वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
आरोग्यमंत्री आबिटकर यांनी सर्व आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये विशेष आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश दिले. अमरावती जिल्ह्यातील धारणी येथील आरोग्य संस्थेचे श्रेणीवर्धन करावे तसेच आरोग्य विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याची कार्यवाही करण्याचे स्पष्ट आदेश त्यांनी दिले.

यासोबतच सर्व आरोग्य संस्थांमध्ये स्वच्छता, पोषणयुक्त आहार व्यवस्था व रुग्णसेवेची गुणवत्ता सुधारण्यावर भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या.
मेळघाट परिसरात सुरू असलेली ॲनेमिया निर्मूलन मोहीम व सिकलसेल तपासणी मोहीम अधिक प्रभावीपणे राबवण्याचे निर्देशही आरोग्यमंत्र्यांनी दिले.तसेच आदिवासी भागांतील आरोग्य व्यवस्थेशी संबंधित ग्रामविकास विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले.






