लोकशाहीला कोणताही धोका नाही
लोकशाहीला धोक्यात आणण्याचे काम करणारेच धोक्यात येतील – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.18 – एक व्यक्ती एक मत ; एक मूल्य या समतेचा तत्वाचा पुरस्कार करणारी भारतीय लोकशाही जगातील सर्वश्रेष्ठ लोकशाही आहे.महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या संविधानामुळे भारतीय लोकशाहीला कोणताही धोका नाही.जे लोक लोकशाहीला धोक्यात आणण्याचा प्रयत्न करतील तेच लोक धोक्यात येतील असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुंबईत बांद्रा कुर्ला संकुल येथे दिला.
येथील नाबार्ड बँकेच्या सभागृहात नाबार्ड प्रोग्रेसीव्ह एम्प्लॉइज वेल्फेअर असोसिएशन तर्फे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ना.रामदास आठवले प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
यावेळी विचारमंचावर नाबार्ड चे प्रमुख महा व्यवस्थापक जी एस रावत, निलय कपूर, चित्रलेखा चे संपादक ज्ञानेश महाराव, आयोजक बी बी घाडगे, प्रकाश सावंत, अनिल पाटील; अमित तायडे; प्रशांत चहांदे; लेबांग मॅडम; दक्षय घेटला; शुभांगी पार्डिकर आदींसह मान्यवर उपस्थित होते.
ना.रामदास आठवले यांनी बांद्रा पूर्व येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या 133 व्या जयंतीनिमित्त आयोजित मिरवणुकीत सहभाग घेत ढोल वाजवून भीम जयंतीचा आनंद साजरा केला.
तसेच वरळी येथे भीम जयंतीनिमीत्त आयोजित मिरवणुकीस भेट देऊन शुभेच्छा दिल्या.यावेळी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
वरळी आणि बांद्रा येथील बुद्धविहारांना भेटी देऊन भीम जयंतीच्या आंबेडकरी जनतेला शुभेच्छा दिल्या.बुद्ध विहारात बुद्ध वंदना भिमस्तुती घेऊन महामानवाला अभिवादन करण्यात आले.