स्मार्ट प्रीपेड मीटर विरोधात आम आदमी पार्टीसह जनतेचे महा जनआंदोलन

आम आदमी पार्टीचे स्मार्ट मीटर विरोधात मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषण

स्मार्ट प्रीपेड मीटर ला आम आदमी पार्टीसह आम जनतेचा विरोध होणार महा जनआंदोलन

जगदीश का.काशिकर,मुक्त पत्रकार मुंबई, व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी द्वारे महाराष्ट्रात सक्तीने लावण्याच्या निर्णयामुळे राज्यातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, लघु उद्योजक, आणि व्यावसायिकांवर अन्यायकारक आर्थिक बोजा पडणार असल्याने पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभमीवर आम आदमी पार्टीने आजाद मैदान मुंबई येथे बेमूदत उपोषण सुरु केले आहे.

स्मार्ट मीटर लावण्याचा निर्णय भांडवलदारी कंपन्यांना फायदा करण्यासाठी घेतला गेला आहे.या कंपन्यांनी सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला देणग्या दिल्याचा आरोप होत आहे. या स्मार्ट मीटर्स चे टेंडर अदानी ग्रुप,एनसीसी कंपनी आणि मॉन्टेकार्लो कंपनी यांना दिलेले असून या कंपन्या प्रत्यक्षात स्मार्ट मीटर निर्मिती करत नाहीत. त्यामुळे हा निर्णय संशयास्पद असून यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक हितसंबंध आणि घोटाळा झाल्याचा आरोप यावेळी आप चे कार्याध्यक्ष अजित फाटके पाटील यांनी केला.

जो पर्यंत राज्य सरकार याबाबत ठोस भूमिका घेत नाही, तोपर्यंत हे उपोषण सुरू राहणार असून स्मार्ट मीटर सक्तीच्या विरोधात प्रसंगी ऊर्जा मंत्र्यांना घेरावा घालू असा इशारा प्रदेश संघटन मंत्री संदीप देसाई यांनी दिला आहे.

स्मार्ट मीटर चा उपक्रम आणण्यामागे महायुती सरकारचा खरा उद्देश म्हणजे राज्यातील पूर्ण वीज वितरण प्रणालीचे खाजगीकरण करणे आहे. ज्याप्रमाणे टेलिकॉम क्षेत्राची खाजगीकरण करुन संपूर्ण क्षेत्र २ – ३ खाजगी कंपन्यांना आंदण दिले आहे त्याप्रमाणे वीज क्षेत्रात खाजगीकरण करून आंदण देण्याचा कुटिल डाव आम आदमी पार्टी कदापी यशस्वी होऊन देणार नाही असे प्रतिपादन राज्य उपाध्यक्ष धनंजय शिंदे यांनी केले.

सरकारने अधिकृतरीत्या लेखी स्वरूपात स्मार्ट प्रीपेड मीटर राज्यात लावल्या जाणार नाही असे स्पष्ट करावे तसेच स्मार्ट मीटर लावण्यासंबंधीचे सगळे टेंडर तत्काळ रद्द करण्यात यावे अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.

स्मार्ट मीटरसाठी प्रत्येक मीटरची किंमत १२,०००/- रुपये असून, ही किंमत अपेक्षित किंमतीपेक्षा दुप्पट आहे. महाराष्ट्र सरकारने २ कोटी २५ लाख ६५ हजार मीटर बदलण्याची तयारी केली आहे, ज्यासाठी ३९,६०२ कोटी रुपये खर्च होणार आहे.यातील अदानी ग्रुप, एनसीसी कंपनी आणि मॉन्टेकार्लो या कंत्राट दिलेल्या कंपन्या स्मार्ट मीटर निर्मिती करत नाहीत.

स्मार्ट मीटर लावल्यामुळे वीज चोरी थांबणार असल्याचा सरकारचा दावा खोटा आहे. वीज चोरी बहुदा २० के.वि. पेक्षा जास्त विद्युत दबाव वापर करणाऱ्या ग्राहकांकडून होते. सरकारने जनतेची दिशाभूल करणे योग्य नाही. स्मार्ट मीटरच्या नावाखाली अकाऊंट आणि बिलिंग विभागाच्या कर्मचाऱ्यांची कपात होणार असल्याने हजारो कर्मचाऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली.

मागील महिन्यात आम आदमी पार्टी वतीने या अन्यायकारक निर्णयाचा विरोधात राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले.आगामी काळात राज्यव्यापी आंदोलन उभे करून जनतेवर होणाऱ्या दडपशाही विरोधात आवाज उठवण्यात येईल.

आझाद मैदान येथील आंदोलनात राज्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी हजारोंच्या संख्येने सहभागी झाली असून आप महाराष्ट्राचे कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके पाटील, राज्य उपाध्यक्ष विजय कुंभार व धनंजय शिंदे, राज्य संघटनमंत्री संदीप देसाई, डॉ रियाझ पठाण, भूषण ढाकुलकर, मनीष मोडक, नविंदर अहलुवालिया, राज्य, जिल्हा व महानगर पालिका क्षेत्रातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.


Discover more from Dnyan pravah news

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from Dnyan pravah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading