महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट


नवी दिल्ली / मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.8 ~ महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्धांना बुद्धगया येथील महाबोधी वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली त्या परमपवित्र स्थळी महाबोधी महाविहार उभारण्यात आले आहे. जगभरातील बौद्धांचे सर्वोच्च श्रद्धास्थान बुद्धगया येथे महाबोधी महाविहार आहे. त्याची विश्वस्त व्यवस्था ही 1949 च्या बी टी ऍक्ट नुसार चालते त्यात 4 बौद्ध आणि 4 हिंदू ट्रस्टी असून कलेक्टर चेअरमन असतो. त्यात बदल करून सर्व ट्रस्टी आणि चेअरमन हे बौद्धच असले पाहिजेत असा कायदा करून महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे अशी आग्रही मागणी आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची संसदेत भेट घेऊन केली.


प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत ना.रामदास आठवले यांनी 10 मिनिटे चर्चा केली.यावेळी सिन्दुर ऑपरेशन द्वारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानी दहशतवादी अड्डे नष्ट करण्याची केलेली कामगिरी उत्कृष्ट असून त्याबद्दल सर्व देशवासी आपले आभार मानत असल्याचे सांगत ना.रामदास आठवले यांनी प्रधान मंत्र्यांचे सिन्दुर ऑपरेशन केल्याबद्दल अभिनंदन केले.

रिपब्लिकन पक्ष राष्ट्रीय स्तरावर एन डी ए चा घटका पक्ष आहे तसाच महाराष्ट्रात महायुती चा घटक पक्ष आहे.महाराष्ट्रात सत्तेत रिपब्लिकन पक्षाला वाटा मिळत नसल्याची खंत मांडत रिपब्लिकन पक्षाला महाराष्ट्रात सत्तेत वाटा मिळाला पाहिजे अशी मागणी ना.रामदास आठवले यांनी केली.मुंबईत इंदु मिल स्थळी वेगाने उभारण्यात येणाऱ्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर अंतरराष्ट्रीय स्मारक कामाचे भूमिपूजन आपल्या हस्ते झाल्याची आठवण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना ना.रामदास आठवले यांनी करून दिली.

