पंढरपूर ते अयोध्या,तिरुपती बालाजी, वाराणसी रेल्वे गाडी सुरू करा- पंढरपूर शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेच्या वतीने मागणी
पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज- शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेच्या वतीने पंढरपूर रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्तर यांच्याकडे पंढरपूर मधून 1) पंढरपूर ते अयोध्या, 2) पंढरपूर ते तिरुपती बालाजी, 3) पंढरपूर ते वाराणसी या तिन्ही ठिकाणी आठवड्यातून एकदा रेल्वे गाडी सुरू करण्यात यावी अशी मागणी शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
यावेळी श्री बाबा हरी मठाचे महंत श्री विठ्ठलगिरी महाराज,श्री चौरंगीनाथ मठाचे विश्वस्त श्री योगी रवीनाथ महाराज, शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना शहर प्रमुख श्रीनिवास उपळकर,गणेश भिंगारे, नागेश लिगाडे, माऊली कोळी, विशाल डोंगरे आदी उपस्थित होते.

तीर्थक्षेत्र पंढरपूर ते अयोध्या, तिरुपती बालाजी,वाराणसी रेल्वे गाडी सुरू करावी अशी मागणी बऱ्याच वर्षांपासून भाविक भक्तांकडून होत होती याची दखल घेत पंढरपूर शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेच्यावतीने ही मागणी करण्यात आली.
या तिन्ही ठिकाणांना धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे त्यामुळे भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने रेल्वेची सोय झाल्यास प्रवासाला सुलभता येईल आणि चार ही तीर्थक्षेत्र जोडली जातील.रेल्वेमुळे या भागामध्ये आर्थिक विकासही होईल. यामुळे या तीन तीर्थक्षेत्रांना पंढरपूरमधून आठवड्यातून एकदा रेल्वेगाडी सुरू करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.


