मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान बुधवारी राज्यस्तरीय शुभारंभ
सोलापूर जिल्ह्यात १७ सप्टेंबर पासून प्रारंभ – सिईओ कुलदीप जंगम
सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१५/०९/२०२५ – मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान शासनाच्या या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाचा शुभारंभ बुधवार दि.१७ सप्टेंबर २०२५ रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून होणार आहे.सोलापूर जिल्ह्यात सर्व ग्रामपंचायतीमध्ये या अभियानाचा शुभारंभ होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मौजे किनगाव ता.फुलंब्री जि. छत्रपती संभाजीनगर येथे सकाळी १० वाजता या अभियानाचा शुभारंभ होणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार,जिल्हा व तालुकास्तरीय सर्व खाते प्रमुख हे त्यांच्या कार्यक्षेत्रातील एक ग्रामपंचायतीस उपस्थित राहून अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करणेकरिता अभियानाचा शुभारंभ करणार आहेत.त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लोकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या अभियानात सहभागी होऊन अभियान यशस्वी करावे,असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केले आहे.
राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण प्रादेशिक विभाग, जिल्हा,तालुका व ग्रामपंचायत या चारही स्तरावर करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ यांनी दिली.
दि.17.09.2025 रोजीचे सर्व ग्रामसभांच्या ठिकाणी शुभारंभ कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.सकाळी 08.45 ते सकाळी 9 वाजता ग्रामसभा होणार आहे. सकाळी 9.00 ते सकाळी 9.10 यावेळेत अभियानाबाबत ग्रामस्थांना आवाहन करणेत येणार आहे.सकाळी 09.10 ते सकाळी 09.40 या वेळेत प्रविण प्रशिक्षकांकडून अभियानाची सविस्तर माहिती देणेत येणार आहे.सकाळी 09.40 ते सकाळी 10.00 यावेळेत उपस्थित मान्यवरांचे मार्गदर्शन तर सकाळी 10.00 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ होणार असल्याचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ यांनी सांगितले.

