सोलापुरात ७ फेब्रुवारीला ‘जनमत’ व ‘पत्र प्रबोधन’ पुस्तकांचा भव्य प्रकाशन सोहळा
वाचकांच्या पत्रांतून शहराचे प्रश्न : सोलापूरच्या लोकभावनांचा आरसा : जनमत व पत्र प्रबोधन पुस्तकांचे प्रकाशन
Solapur news:सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज :सोलापूर शहरातील नागरी प्रश्न, लोकभावना आणि प्रशासनाच्या भूमिकेवर भाष्य करणाऱ्या फैय्याज शेख लिखित जनमत व अरुण धुमाळ लिखित पत्र प्रबोधन या दोन महत्त्वपूर्ण पुस्तकांचा प्रकाशन सोहळा शनिवार, ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सोलापुरात आयोजित करण्यात आला आहे. सोलापूर जिल्हा वृत्तपत्र लेखक मंचाच्या वतीने हा कार्यक्रम सायंकाळी ५.३० वाजता श्री हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात होणार असल्याची माहिती मंचाचे कार्यवाह सुनील पुजारी यांनी दिली. वाचकांच्या पत्रांमधून शहराच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडणारे हे पुस्तक वाचकांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.

सोलापूर : शहरातील नागरी समस्या, लोकभावना आणि प्रशासनाच्या भूमिकेवर थेट भाष्य करणाऱ्या दोन महत्त्वपूर्ण पुस्तकांचा प्रकाशन सोहळा सोलापूर जिल्हा वृत्तपत्र लेखक मंचाच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन वाचनालयाचे अध्यक्ष डॉ.श्रीकांत येळेगावकर यांच्या हस्ते होणार असून ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.यावेळी गॅस्ट्रोइंट्रोलॉजी व हेपॅटोलॉजी तज्ज्ञ डॉ.सूर्यप्रकाश कोठे आणि महाराष्ट्र साहित्य परिषद,पुणे सोलापूर जिल्हा प्रमुख पद्माकर कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
वृत्तपत्रांतील वाचकांची पत्रे हा स्तंभ लोकशाहीचा आरसा मानला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून फैय्याज शेख आणि अरुण धुमाळ यांनी आपल्या लेखणीतून सोलापूर शहरातील जळजळीत प्रश्न प्रशासनासमोर मांडले आहेत. या दोन्ही पुस्तकांमधून सामाजिक व ऐतिहासिक दस्तऐवज स्वरूपातील लेखन वाचकां साठी उपलब्ध होत आहे.
या प्रकाशन सोहळ्यास सोलापूरकर नागरिक,वाचक व साहित्यप्रेमींनी उपस्थित राहावे,असे आवाहन सुनील पुजारी यांनी केले आहे.






