नंदेश्वर येथे अवकाळी पावसाचा मोठा फटका; बेदाणे शेडचे नुकसान, वीज पडून गाय दगावली, आ.समाधान आवताडे यांनी पाहणी करत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदतीच्या प्रशासनाला सूचना
नंदेश्वरमध्ये अवकाळी पावसाचा मोठा फटका; बेदाणे शेडचे नुकसान, वीज पडून गाय दगावली – समाधान आवताडे यांची पाहणी
नंदेश्वर | ज्ञानप्रवाह न्यूज : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अचानक झालेल्या पावसाने द्राक्ष उत्पादनासाठी उभारण्यात आलेल्या बेदाणे शेडचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे.नंदेश्वर येथील शेतकरी धोंडीराम गरंडे यांची गाय वीज पडून मृत्यूमुखी पडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
या घटनेची माहिती मिळताच आमदार समाधान आवताडे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. त्यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

यावेळी प्रांत अधिकारी बी.आर.माळी,तहसीलदार मदन जाधव, तालुका कृषी अधिकारी मनिषा मिसाळ, पंचायत समिती सभापती दिपाली ताड, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर, उपनगराध्यक्ष येताळा भगत, पंचायत समिती सदस्य आप्पासाहेब निकम,मंडल कृषी अधिकारी बालाजी टेकाळे, कृषी पर्यवेक्षक ढाने, सहाय्यक दिपक कोकरे, तलाठी महेश राऊत, पशुधन विकास अधिकारी कुंभार,माजी नामदेव जानकर, दादासाहेब दोलतडे,अशोक चौंडे, भारत गरंडे,दामाजी बंडगर,राहुल कसबे,ज्ञानेश्वर गरंडे,जयसिंग कांबळे,नानासाहेब बंडगर, मायाप्पा गरंडे,आण्णासाहेब बंडगर,दत्ता साबणे,आण्णासाहेब पाटील,सिद्धेश्वर डांगे तसेच स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी आमदार समाधान आवताडे म्हणाले की, नंदेश्वर परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शासनाच्या माध्यमातून बाधीत शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार आहे.प्रशासनाने पंचनामे जलद गतीने पूर्ण करून एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
आमदार आवताडे यांनी प्रशासनाला तातडीने हालचाल करण्याचे आदेश देत, नुकसानग्रस्त पिकांचे, घरांचे तसेच मृत जनावरांचे पंचनामे त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच पंढरपूर–मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील सर्व बाधितांना शक्य तितक्या लवकर आर्थिक मदत मिळवून देण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले असून, शासनाने तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी स्थानिक शेतकरी व नागरिकांकडून होत आहे.

