Govind Dotasara: ‘…तर महिला स्वत:ला पुरुषांच्या वरचढ समजू लागतात’, शिक्षणमंत्र्यांची वाचाळ बडबड
हायलाइट्स:
- आंतरराष्ट्रीय कन्या दिनाच्या कार्यक्रमात शिक्षणमंत्री सहभागी
- ‘शाळेत अधिक महिला स्टाफ म्हणजे अधिक भांडणं’
- राजस्थानच्या शिक्षण मंत्र्यांची मुक्ताफळं
‘महिला अधिक भांडणं करतात. त्यातही जर महिला स्टाफनं आपापली भांडणं आपांपसांत मिटवली तर त्या स्वत:ला पुरुषांच्या वरचढ समजू लागतात’ अशी मुक्ताफळं खुद्द शिक्षणमंत्र्यांनी उधळल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येतंय.
शिक्षणमंत्री डोटसरा एव्हढ्यावरच थांबले नाहीत तर, ‘ज्या शाळांत महिला स्टाफ अधिक असेल, तिथे सर्वाधिक भांडणं होतात. त्याचा परिणाम म्हणजे मुख्याध्यापक किंवा शिक्षकांपैंकी कुणाला ना कुणाला सॅरिडॉन (डोकेदुखीवर वापरलं जाणारं औषध) घ्यावी लागते’, अशी पुश्तीही त्यांनी पुढे जोडली.
‘आपल्या विभागाचा प्रमुख म्हणून मला हे सांगावसं वाटतंय की ज्या शाळांमध्ये महिला स्टाफ अधिक आहे, तिथे सगळा सावळा गोंधळ असतो… तिथे भांडणंही सर्वात जास्त असतात… कधी सुट्टीबद्दल भांडणं होतात, तर कधी आणखी एखाद्या मुद्यावर…’ असंही त्यांनी म्हटलं.
उल्लेखनीय म्हणजे, राजस्थानचे शिक्षणमंत्री असलेले गोविंद सिंह डोटसरा राजस्थान प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही सांभाळत आहेत.
‘राजस्थान सरकारनं नेहमीच महिलांची सुरक्षा आणि आरामाची काळजी घेत नोकरीमध्ये मनपसंत तैनातीची काळजी घेतलीय. परंतु, तरीही महिला स्टाफला एकमेकांबद्दल नेहमीच काही ना काही तक्रारी राहतातच. माझं तर म्हणणं आहे की महिलांनी या छोट्या छोट्या गोष्टी सोडून दिल्या तर त्या नेहमीच पुरुषांपेक्षा पुढे राहतील’ म्हणणारे डोटसरा आता चांगलेच चर्चेत आलेत.