Mumbai Unlock Update: मुंबईत रेस्टॉरंट, दुकाने, इतर आस्थापना रात्री किती वाजेपर्यंत?; पालिकेचा आदेश जारी
हायलाइट्स:
- राज्य सरकारच्या आदेशानंतर मुंबई पालिकेचा निर्णय.
- रेस्टॉरंट रात्री १२ तर दुकाने रात्री ११ पर्यंत सुरू राहणार.
- दिवाळीच्या तोंडावर मुंबईकरांना खूप मोठा दिलासा.
वाचा:करोनाच्या दुसऱ्या लाटेविषयी राजेश टोपे यांचं अत्यंत सावध विधान
‘ब्रेक-द-चेन’ अंतर्गत महाराष्ट्र शासनाने पारित केलेल्या नियमांनुसार सर्व भोजनालये व उपहारगृह रात्री १२ पर्यंत तर इतर आस्थापने रात्री ११ पर्यंत खुली ठेवण्यास परवानगी दिली आहे. हा आदेश तत्काळ प्रभावाने आजपासूनच मुंबई महापालिका क्षेत्रात जसाच्या तसा लागू करण्यात येत आहे, असे पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी नमूद केले आहे. शासनाने वेळोवेळी जाहीर केल्याप्रमाणे सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर व इतर उपाययोजना अनिवार्य राहतील. या आदेशांची अंमलबजावणी करण्यास कोणतीही व्यक्ती टाळाटाळ करत असेल अथवा विरोध दर्शवित असेल तर संबंधिताविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियमातील विविध कलमांन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. पुढील आदेशापर्यंत हा आदेश जसाच्या तसा लागू राहणार आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
वाचा: महाराष्ट्रात पुढचं सरकार कुणाचं असेल?; शरद पवार यांनी केलं मोठं विधान
राज्य सरकारच्या आदेशात काय म्हटलंय?
टास्क फोर्सच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वांची मते व कोविडची स्थिती लक्षात घेऊन रेस्टॉरंट व दुकानांची वेळ वाढवून देण्यास परवानगी दिली होती. तसेच अनेक निर्बंध शिथील करण्याची भूमिका घेतली होती. त्यानुसार पावले टाकण्यात येत आहेत. आजच याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आला असून त्यात रेस्टॉरंट रात्री १२ वाजेपर्यंत तर इतर दुकाने रात्री ११ पर्यंत उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. कोविडसाठी लागू असलेल्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन नागरिकांना आणि आस्थापनांना करावे लागणार आहे. पूर्णपणे लसीकरण, गर्दीच्या क्षमतेवर निर्बंध, हे परिस्थिती नुसार लागू राहील. सध्या सणासुदीचे दिवस आहेत. दुकाने, रेस्टॉरंट, हॉटेल इत्यादी सार्वजनिक ठिकाणी लोकांची जास्त गर्दी होण्याची शक्यता लक्षात ठेवून हा वेळ वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे यात नमूद करण्यात आले आहे. पूर्वी लावलेल्या निर्बंधांमध्ये कोणतीही सवलत देण्यात येणार नसून फक्त रेस्टॉरंट, खाद्य पदार्थ पुरविणारे यांच्यासाठीच रात्री १२ पर्यंत आपले आस्थापन चालू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे इतर आस्थापना रात्री ११ वाजेपर्यंत चालू राहतील. स्थानिक प्रशासन या वेळांमध्ये स्थानिक आवश्यकतेनुसार निर्बंध लाऊ शकते किंवा सवलत देऊ शकते, असे आपत्ती व्यवस्थापन विभागाने नमूद केले आहे.
वाचा: भाजपने राज ठाकरे यांच्या नादाला लागू नये!; आठवले यांनी जोरदार फटकेबाजी