शिवबा काशिद, जिवाजी महाले महापुरुषाचा इतिहास सुवर्ण अक्षरात लिहीण्याजोगा – प्रा.श्रीमंत कोकाटे

नाभिक समाजातील शिवबा काशिद, जिवाजी महाले महापुरुषाचा इतिहास सुवर्ण अक्षरात लिहीण्याजोगा – प्रा.श्रीमंत कोकाटे


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------


पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- जेवढा आदर आणि श्रध्दा छत्रपती शिवाजी महाराजांच्या ठायी असली पाहिजे तेवढा आदर आणि श्रध्दा शिवबा काशिद आणि जिवाजी महाले यांच्या विषयी असली पाहिजे.भेदभाव करण्याचा कुणालाही अधिकार नाही कारण या महापुरुषांनी बलिदान दिले त्याग केला आहे. त्यामुळे नाभिक समाजातील शिवबा काशिद, जिवाजी महाले या महापुरुषांचा इतिहास सुवर्ण अक्षरात लिहीण्याजोगा असल्याचे मत प्राध्यापक श्रीमंत कोकाटे यांनी व्यक्त केले.

हिंदवी स्वराज्यभूषण शिवबा काशिद यांच्या जयंतीनिमित्त शिवतीर्थ येथे सकल नाभिक समाज व जिवा-शिवा प्रतिष्ठाण पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी प्रा.कोकाटे म्हणाले,होता जिवा म्हणून वाचला शिवा असा एकेरी उल्लेख पाठ्यपुस्तकात केला आहे. असा उल्लेख न करता होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी असा उल्लेख झाला पाहिजे.याबाबत बालभारती पाठ्यपुस्तक विभागाकडे पाठपुरावा करत आहे.आपल्या महापुरुषाचे नावे आदराने व सन्मानपूर्वक घेतली पाहिजे. नाभिक समाजाला राजघराणं, छत्रिय परंपरा, संत परंपरा, विश्‍वासू मावळे यांची फार मोठी परंपरा लाभली आहे.अहिंसेचे पुजारी गौतम बुद्ध यांचे पहिले शिष्य उपाली ते स्वातंत्र्य सेनानी वीरभाई कोतवाल, श्री.संत सेना महाराज ते श्री.संत नगाजी महाराज, चंद्रगुप्त मौर्य ते सम्राट अशोक, शिवरत्न जिवाजी महाले ते शिवबा काशीद अशी परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे कैवारी होते. हिंदवी स्वराज्याची गुढी उभारत असताना अनेक मावळे शहीद झाले. त्यामध्ये नाभिक समाजाचे जिवा महाले व शिवबा काशीद होते. शिवचरित्रकार पं. सेतुमाधवराव पगडी यांनी म्हटल्याप्रमाणे,जेथे महाराजांचा घाम पडला तेथे लोकांनी आपले रक्त सांडले. शिवबा काशिद हा अशाच रक्त सांडणार्‍या व स्वराज्यासाठी स्वबलिदान देणार्‍या लोकांपैकी होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व हिंदवी स्वराज्य भूषण शिवबा काशिद यांच्या मुर्तीचे पुजन करण्यात आले. त्याप्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे उपाध्यक्ष वैभव शेटे, संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते अमरजित पाटील, संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दिपक वाडदेकर,बारा बलुतेदार अलुतेदार तालुका अध्यक्ष किशोर भोसले,जिल्हा युवकाध्यक्ष किरण भांगे, सुमंगल नागरी सहकारी पतसंस्थाचे माजी चेअरमन नारायण खंडागळे, प्रशांत वाघमारे, डॉ.तुषार खंडागळे उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी संजिवनी गोरे,मोहन जमदाडे,सिद्राम रुद्रार,मनोज डिगे,पांडुरंग डांगे,अशोक माने, दिपक सुरवसे आदी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती समिती अध्यक्ष महेश माने,मनोज गावटे, निलेश शिंदे, युवराज हडपद, सोमनाथ चिखले,सागर खंडागळे,अविनाश शेटे,राकेश देवकर,संतोष हिल्लाळ,परमेश्वर डांगे,स्वरूप चव्हाण,श्लोक यादव,मानव माने,सार्थक चव्हाण,श्रीयश यादव,रमेश शिंदे ,हेमंत राऊत, नागराज हडपद आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संयोजक सतीश चव्हाण व सोमनाथ खंडागळे यांनी आभार मानले.


Discover more from Dnyan prawah news

Subscribe to get the latest posts sent to your email.


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------

Leave a Reply

Discover more from Dnyan prawah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading