आठ दिवसात पिक विमा संदर्भातील सर्व तक्रारींचा निपटारा करा – आमदार समाधान आवताडे यांचा विमा अधिकाऱ्यांना इशारा
मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,१०/०५/२०२५ – पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये शेतकऱ्यांनी भरलेल्या खरीप पिक विम्या मध्ये विमा कंपनींकडून मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली असून अर्धा हेक्टर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यालाही 5197 व 3 हेक्टर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्याला ही 5197 रुपयेच विमा मंजूर केला असल्याचे शेतकऱ्यांनी आमदार समाधान आवताडे यांनी आयोजित केलेल्या बैठकीत उघडकीस आणले त्यामुळे विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना आमदार समाधान आवताडे यांनी जाब विचारत आठ दिवसात शेतकऱ्यांच्या सर्व तक्रारी मार्गी लावा अन्यथा मी तुमच्या वरिष्ठांसोबत शासन स्तरावर बैठक लावून विमा कंपनीवर कारवाई करण्यास भाग पाडेन असा इशारा आमदार समाधान आवताडे यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिला.यावेळी माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब लांडगे,तालुका कृषी अधिकारी मंगळवेढा मनीषा मिसाळ, पंढरपूर तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत मोरे, इन्शुरन्स कंपनी प्रतिनिधी उमेश पळसे, माजी सभापती प्रदीप खांडेकर, अजित जगताप, सोमनाथ माळी, औदुंबर वाढदेकर, यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार समाधान आवताडे यांनी शनिवारी सकाळी दहा वाजता मंगळवेढा तालुका कृषी कार्यालयाच्या सभागृहामध्ये कृषी अधिकारी विमा कंपनीचे अधिकारी व शेतकऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली.या बैठकीमध्ये मतदार संघातील सर्रास शेतकऱ्यांनी विमा कंपनी विरोधात तक्रारी केल्या खरीप हंगाम 2023-2024 हंगामा करता भरलेल्या विमा पॉलिसी मध्ये कंपनीच्या नियमानुसार 72 तासाच्या आत नुकसानीची माहिती देणे बंधनकारक होते त्यानुसार 72 तासाच्या आत माहिती देऊनही अनेक शेतकऱ्यांचे पंचनामेही झाले नाहीत व त्यांना मदत ही मिळाली नाही ज्यांना विमा मंजूर झाला व ज्यांना ना मंजूर झाला त्या कोणत्याही शेतकऱ्यांच्या याद्या कंपनीकडून उपलब्ध करून दिल्या जात नाहीत किंवा कंपनीच्या संकेतस्थळावरही प्रकाशित केल्या नाहीत. कंपनीच्या प्रतिनिधींनी काही शेतकऱ्यांना हाताशी धरून ठराविक लोकांचे पंचनामे केले आहेत अशा लेखी तक्रारी शेतकऱ्यांनी आमदार समाधान आवताडे यांच्याकडे या बैठकीत दिल्या.

यावेळी आमदार समाधान आवताडे यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना आठ दिवसात शेतकऱ्यांचा सर्व तक्रारी मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. मंजूर झालेल्या 14 कोटी 27 लाख रुपयांच्या विमा रकमेचा आढावा त्यांनी घेत शेतकऱ्यांचा खात्यावर ही रक्कम जमा होण्यास सुरू असल्याचे सांगितले. उडीद, सूर्यफूल, करडई या पिकांचा विमा संरक्षित पिकांमध्ये समावेश करण्यासंदर्भात प्रयत्न करणार असल्याचे आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले. त्याचबरोबर स्वयंचलित हवामान केंद्रे तालुक्यामध्ये 26 ठिकाणी मंजूर असून ती अद्याप का बसवली नाहीत याबाबत ही आढावा घेत तत्काळ हवामान केंद्र उभारण्याच्या सूचना दिल्या.खते बी बियाणे लवकरच उपलब्ध करून घ्यावीत त्यासाठी दुकानदाराने आतापासूनच तयारी करावी,जलतारा प्रकल्प सर्व शेतकऱ्यांनी राबवावा अशा सूचनाही आ.समाधान आवताडे यांनी दिल्या.
यावेळी विजयसिंह देशमुख,शशिकांत चव्हाण ,दत्तात्रय जमदाडे, प्रवीण खवतोडे, संजय कट्टे,बाळासाहेब सावंत, तुकाराम कुरे, विनायक यादव,शाम आकळे,जीवन पवार यांचेसह शेतकरी कृषी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.