माय माऊलीनी आमदार अभिजीत पाटील यांच्या गळ्यात पडून मानले आभार
माढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२५/०९/२०२५ – गेल्या काही दिवसांपासून माढा तालुक्यामध्ये सीना नदीकाठच्या गावांना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.त्या संकटाच्या काळामध्ये आमदार अभिजीत पाटील हे प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी रात्रंदिवस पुरात अडकलेल्या लोकांसाठी रेस्क्यू ऑपरेशनमध्ये स्वतः पुराच्या पाण्यामध्ये उतरून नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी अतोनात प्रयत्न करत होते. त्याच प्रयत्नातून तांदूळवाडी येथील कुटुंबाला आमदार अभिजीत पाटील यांनी वाचवल्यानंतर त्या मायमाऊलीने आमदार अभिजीत पाटील यांचे गळ्यात पडून आभार मानले.

आमदार अभिजीत पाटील हे कधी रेस्क्यू बोटच्याद्वारे नागरिकांचे जीव वाचवण्यामध्ये यशस्वी झाले तर कधी हेलिकॉप्टरने अडकलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यामध्ये यशस्वी झाले. कुठे त्यांच्या सहकाऱ्यांकडून सुरक्षित ठिकाणी ठेवलेल्या लोकांची गैरसोय होऊ नये होऊ नये, म्हणून पाणी व जेवणाची सोय करण्यात आली.

आमदार अभिजीत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांना विनंती करून माढा मतदारसंघांमध्ये झालेल्या पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी बोलावले असता त्यांचा मान ठेवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माढा तालुक्यातील निमगाव व सीना दारफळ येथे पूर पाहणी केली.सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी देखील आमदार अभिजीत पाटील यांच्यासोबत उंदरगाव सीना दारफळ या ठिकाणची पूर पाहणी केली.यावेळी सरसकट पंचनामे करण्याची मागणी आमदार अभिजीत पाटील यांनी केली.

आज दि.२५ सप्टेबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते माजी मंत्री जयंत पाटील व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील तसेच खासदार धैर्यशील मोहिते पाटील,अनिल सावंत यांच्यासह अनेक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आमदार अभिजीत पाटील यांच्या माढा मतदारसंघातील लोंढेवाडी व वाकाव येथील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन पूर परिस्थितीची पाहणी केली त्यांना धीर देऊन लवकरच शासन दरबारी या अडचणी मांडून योग्य तो न्याय मिळेपर्यंत आवाज उठवू असे सांगितले.