Coal and Power Crisis: कोळसा संकटात देशवासियांच्या मदतीला रेल्वे धावली!
हायलाइट्स:
- वीज प्रकल्पांना कोळशाच्या तुटवड्याचा सामना करावा लागल्यानं संकट
- रेल्वे गाड्यांच्या लोडिंगची क्षमता वाढवण्याचा निर्णय
- वाढती मागणी पूर्ण करताना मदतीसाठी रेल्वे प्रशासन सज्ज
देशात अनेक वीज प्रकल्पांना कोळशाच्या तुटवड्याचा सामना करावा लागत असल्यानं सरकार आणि संबंधित विभाग अलर्ट मोडवर आहेत. अशावेळी, रेल्वे गाड्यांची लोडिंग क्षमता वाढवून औष्णिक वीज प्रकल्पांपर्यंत कोळसा पोहचवण्याची जबाबदारी भारतीय रेल्वेनं घेतलीय. रेल्वे अधिकाऱ्यांनाही सक्रीय राहण्याची आणि प्रत्येक तासाची माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. सोबतच, प्रत्येक दिवशी लोड केल्या जाणाऱ्या कोळशाच्या संख्येतही वाढ करण्यात आलीय.
कोळशाची कमतरता ही एक प्रकारे ‘आपात्कालीन परिस्थिती’ समजली जातेय. ‘इंडियन एक्सप्रेस’नं दिलेल्या माहितीनुसार, सर्व झोनल रेल्वेच्या मुख्य संचालक व्यवस्थापकांना नियंत्रण कक्ष तयार ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सोबतच, मंत्रालय आणि व्यवस्थापकांना प्रत्येक तासाचं बुलेटीन तयार करण्यास सांगण्यात आलंय.
यापूर्वी ऊर्जा मंत्री आर के सिंह यांनीही वीज प्रकल्पांत निर्माण झालेल्या कोळशाच्या तुटवड्यावर चिंता व्यक्त केलीय. इतकंच नाही तर कोळशाची टंचाई आणि वीज संकटाबाबत राज्यांनी केंद्राकडे तक्रारी केल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही सोमवारी एक उच्चस्तरीय बैठक घेतली.
सोमवारी एकाच दिवशी १७.७ लाख टन कोळशाचं परिवहन करण्यात आलं. गेल्या वर्षी याच दिवसाचा आकडा १४.८ लाख टन होता. कोळशाची वाढती मागणी पूर्ण करण्याच्या दृष्टीने रेल्वेच्या मदतीची आणखीन गरज लागली तर त्यासाठी प्रशासन तयार असल्याचं रेल्वे प्रशासनानं म्हटलंय.