वारकऱ्यांची आरोग्य सेवा हीच पांडुरंगाची सेवा असून प्रत्येकाने आपले कर्तव्य पार पाडा – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

वारकऱ्यांची आरोग्य सेवा हीच पांडुरंगाची सेवा असून प्रत्येकाने आपले कर्तव्य पार पाडा – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

पालखी सोहळ्यानंतरही संबंधीत ठिकाणची स्वच्छता, फवारणी व आरोग्य सुविधा देण्यात येणार

पंढरपूर,दि.13- आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 06 जुलै 2025 रोजी होणार असून, या सोहळ्यासाठी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी व जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी तसेच अन्य संताच्या पालखी सोहळ्यासोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक सहभागी होतात.सर्व वारकरी भाविकांना पालखी मार्ग,विसावा तसेच पालखी तळांवर आवश्यक आरोग्य सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य द्यावे.वारकऱ्यांची आरोग्य सेवा करणे ही मोठी भाग्याची गोष्ट असून हीच पांडुरंगाची सेवा आहे.तरी प्रत्येकानेच सर्वश्रेष्ठ सेवाभावाच्या भावनेने कर्तव्य पार पाडावे,असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.

आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर वारकरी भाविकांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधेबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.या बैठकीस आमदार समाधान आवताडे,आमदार राजू खरे,मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम,आरोग्य संचालक डॉ.विजय कंदेवार,अति संचालक डॉ.संदीप सांगळे,आरोग्य उपसंचालक डॉ.राधाकिशन पवार, प्रांताधिकारी सचिन इथापे, कार्यकारी अभियंता अमित निमकर,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष नवले, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.महेश सुडके आदी उपस्थित होते.

आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, प्रत्येक वारीत आरोग्य विभागाने चांगले केले आहे. या वारीतही आरोग्य विभागाने सूक्ष्म नियोजन करुन वारकरी भाविकांना अधिक च्या सोयी-सुविधा उपलब्ध कराव्यात यामध्ये कोणतेही त्रुटी राहू नये यांची दक्षता घ्यावी. साथरोग नियंत्रणाच्या दृष्टीने पालखीच्या सर्व मार्गावरील पाणी स्त्रोतांचे सर्वेक्षण तसेच पाणी नमुने तपासणी करावी.पालखी मार्गावर संबधित गावातून पालखी सोहळे मार्गस्थ झाल्यानंतर त्या ठिकाणची स्वच्छता करुन तात्काळ औषध फवारणी करावी. तेथील स्थानिक नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात.महिला वारक-यांसाठी स्त्रीरोगतज्ञाच्या माध्यमातून विशेष तपासणीचे नियोजन करावे,अशा सूचना त्यांनी दिल्या.

पालखी मार्गावर पुरेसा औषधसाठा व तज्ञ प्रशिक्षित मनुष्यबळ यांची उपलब्धता ठेवावी.पालखी सोहळ्यासोबत राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी भाविक येतात यासाठी आरोग्य विभागाच्या विविध कल्याणकारी योजना,सुविधा आदीं बाबतचा प्रचार -प्रसिध्दी करण्यात यावी. जेणेकरुन आरोग्य विभागाच्या विविध आरोग्य कार्यक्रमांची माहिती सर्व वारक-यांपर्यत पोहोचविण्यात मदत होईल,असेही आरोग्य मंत्री श्री.आबिटकर यांनी सांगितले.

पंढरपूर शहर त्याचबरोबर पालखी मार्गावरील खाजगी दवाखान्यात महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत असणा-या रुग्णालयांना 10 टक्के खाटा आरक्षित करण्यात येणार असून ट्रॉमा आय.सी.यू.सेंटरच्या ठिकाणी तज्ञ मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.पालखी मार्गावर वैद्यकीय पथके,आवश्यक उपकरणे व औषधांसह सुसज्ज 331 रुग्णवाहिका तैनात करण्यात येणार आहेत.46 ठिकाणी 10 खाटांचे तात्पुरते आय.सी.यू.कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत.दिंड्यांसोबत पालखी मार्गावर 290 आरोग्यदुत बाईक ॲंम्ब्युलन्स व्दारे आरोग्य सेवा देणार आहेत.वारकरी भाविकांना औषधी किट आरोग्य विभागाच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहितीही आरोग्य मंत्री आबिटकर यांनी दिली.

आमदार आवताडे म्हणाले,आतापर्यंत वारी कालावधीत आरोग्य विभागाने चांगल्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या असल्याचे सांगत पालखी मार्गावर तसेच पंढरपूर शहारात आपला दवाखाना, ट्रामा केअर सेंटर , उपलब्ध आरोग्य सुविधा याबाबत ठळक फलक लावावेत जेणे करुन भाविकांना आरोग्य सुविधेचा लाभ घेता येईल.वारी संपल्यानंतर स्थानिक नागरिक आजारी पडण्याची शक्यता लक्षात घेवून वारी नंतरही आरोग्य सुविधा उपलब्ध ठेवाव्यात असे सांगितले.

आमदार राजू खरे म्हणाले,आषाढी यात्रा कालावधीत येणाऱ्या प्रत्येक वारकरी भाविकाला दर्जेदार सुविधा मिळावी यासाठी मुबलक औषधसाठा,तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपलब्धता ठेवावी.

मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम म्हणाले,पावसाचे वातावरण लक्षात घेवून, पालखी मार्गावरील सर्वच ठिकाणच्या पाणी स्तोत्राचे नमुने तपासणी सुरु आहे.टँकर भरण्याचे ठिकाणी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करुन सदर ठिकाणचे पाणी पिण्यास योग्य असल्याबतचे माहिती देण्यात येणार असल्याचे सांगितले.

यावेळी आरोग्य विभागाच्या वतीने केलेल्या तयारीबाबतचे सादरीकरण आरोग्य उपसंचालक डॉ.राधाकिशन पवार यांनी केले.यामध्ये पालखी मार्गावर प्रत्येक पाच किलोमीटर अंतरावरती २०३ आपला दवाखाना स्थापन करण्यात आले आहेत. पालखी मार्गावरील सर्व आरोग्य संस्थामध्ये पुरेशा औषधसाठा व तज्ञ व प्रशिक्षित मनुष्यबळ यांची उपलब्धता असणार आहेत असे सांगितले.

वाखरी पालखी तळाची आरोग्यमंत्र्यांनी केली पाहणी

आषाढी यात्रेनिमित्त पालखी सोहळ्याबरोबर येणाऱ्या वारकरी भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी वाखरी पालखी तळची पाहणी करून प्रशासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सुविधां बाबत माहिती घेवून आवश्यक सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी त्यांच्या समवेत संचालक डॉ.विजय कंदेवार,आरोग्य उपसंचालक डॉ.राधाकिशन पवार,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुहास माने,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष नवले, गटविकास अधिकारी सुशिल संसारे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.महेश सुडके आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Back To Top